सहा खासदारांच्या पक्षांतर चर्चांदरम्यान वाजे ठाम; ‘उद्धव ठाकरेंसोबतच राहणार’ भूमिकेची राज्यभर चर्चा
सिन्नर : भरत घोटेकर
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदेसेनेत विलीन होण्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र पक्षनिष्ठेचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे. राजकीय दबाव, आमिषे आणि पक्षांतराच्या चर्चांच्या वादळातही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवत त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा आणि निष्ठेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
2014 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधताना राजाभाऊ वाजे यांनी तुम्ही आणि मी असेपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे वचन दिले होते. त्यानंतर अनेकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये त्यांचे नाव घेतले गेले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी मी कालही शिवसेनेत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
गेल्या आठवड्यात पुन्हा पक्षांतराच्या चर्चांना उधाण आल्यानंतरही वाजे यांनी त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती, मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे, असे ठाम विधान करत सर्व तर्कवितर्कांना उत्तर दिले. बुधवारी काही खासदारांच्या विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असताना वाजे हे खासदार संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत दिसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत कोणतीही शंका उरली नाही.
राजाभाऊ वाजे यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति निष्ठा कायम ठेवल्याने सिन्नर येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी जल्लोष केला. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, शहराध्यक्ष पिराजी पवार, गटनेते मनोज देशमुख, उदय गोळेसर, पंकज मोरे, प्रशांत रायते आदी यावेळी उपस्थित होते.
राजाभाऊंच्या निर्णयाने मन उचंबळून येतंय!
खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी मुलाच्या भूमिकेबद्दल अभिमान व्यक्त केला. 1957-58 पासून आमचे कुटुंब राजकारणात आहे. चार पिढ्या राजकारणात गेल्या; मात्र कुणीही आपल्यावर शिंतोडे उडवून घेतले नाही. 14 एप्रिल 2026 रोजी ठाण्याहून आलेल्या दोघांनी अनेक ऑफर्स देऊनही राजाभाऊंनी त्यांना नकार दिला. त्यांनी आपल्या कुटुंबाची परंपरा जपली. बाप म्हणून त्यांच्या भूमिकेचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.
…अन् अश्रूंचा बांध फुटला
प्रामाणिक असूनही सातत्याने फुटीरतावादी खासदारांच्या पंगतीत काही माध्यमांकडून खा. राजाभाऊ वाजे यांचे नाव येत होते. तसेच त्यांनाच माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ येत होती. यामुळे अत्यंत संवेदनशील असलेले खासदार वाजे व्यथित होते. अशा प्रसंगी दिल्लीतील पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केल्यावर, तसेच त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलावर अभिमान व्यक्त केल्याच्या वक्तव्याची आठवण करून दिल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे बघायला मिळाले.
Rajabhau Vaje firmly refuses ‘Operation Tiger’