अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता, पुण्यता, चारित्र्यसंपन्नता, धर्मपरायणता, हातात शंकराची पिंडी घेतलेली, निस्सीम शिवभक्तीने, जिच्या डोईवरचा पदर कधी ढळला नाही आणि काळजातला धीर कधी खचला नाही. अशा या लोकमाता, राजमाता, खर्या अर्थाने मानव धर्माच्या उपासक अहिल्यादेवींचे हे चित्र आज तुमच्या-आमच्या सर्वांच्या मनात कोरलेले आहे. आधुनिक पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांच्या मक्तेदारीवर मात करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आपण इंदिराजींचा उल्लेख करतो. पण याच प्रकारचे 18 व्या शतकात त्यावेळच्या पुरुषी मक्तेदारी व मानसिकतेवर प्रहार करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
कित्येक पिढ्यांच्या गुलामगिरीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात वतनदारी, जहागिरदारी किंवा सरंजामशाहीला स्थान नव्हते. पण पुढे संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मुघल बादशहा औरंगजेबाने मराठी सरदारांना देऊ केलेल्या वतनाच्या लोभातून मराठी राज्य वाचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी पुन्हा वतनदारी, जहागिरी सुरू केली. पुढे छत्रपती शाहूंच्या कालखंडात ती तशीच सुरू राहिली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथांनंतर पेशवेपदाची वस्त्रे पहिल्या बाजीरावांकडे आली. त्यांच्या चाणाक्ष व रत्नपारखी नजरेने मल्हाररावांमधील वेगळेपण ओळखले आणि माळव्याची मोठी जबाबदारी व सारंजाम मल्हाररावांकडे सुपूदर्र् केला. मल्हारराव म्हणजे एक ओजस्वी, तेजस्वी, रांगडं, पण मायाळू व्यक्तिमत्त्व. दृष्टी काळाच्या फार पुढची होती. त्यांनी आपली पत्नी म्हणजे मामाची मुलगी गौतमीलाही बरोबरीने शिक्षण दिले व अधिकारही दिले. युद्ध काळातही सैन्य व्यूहरचना करताना आधी गौतमीबाईंचा व नंतर सूनबाई अहिल्यादेवींचाही सहभाग असे. युद्धात राखीव सैन्याचे महत्त्व अहिल्यादेवी जाणत होत्या. इतकेच नाही, तर मराठ्यांकडे असलेल्या अनेक मनसबदारांपैकी केवळ मल्हाररावांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने स्वतंत्र खाजगीतील दौलत पेशव्यांकडून देण्यात आली होती. ही खाजगीतली दौलत गौतमीबाईंकडून पुढे तशीच अहिल्यादेवींकडे आली आणि होळकरांना दोन प्रकारच्या खाजगी दौलतीचा हिशेब ठेवावा लागत होता. एक मल्हाररावांच्या पत्नीकडे असलेल्या खाजगीतली दौलतीचा आणि सुभेदार मल्हारराव म्हणून त्यांच्याकडे मराठा साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सैन्याच्या दाणापाण्यासाठी मिळालेल्या सारंजामचा.
इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्यादेवींना दोन मुलं होती. त्या सती जायला निघाल्या. पण सासर्यांच्या आग्रहाने त्या सती गेल्या नाहीत. पुढे काळाच्या ओघात सासूबाई गौतमीबाई,
इसवी सन 1766 मध्ये सासरे मल्हारराव, मुलगा भालेराव व नातू नाथोबा, जावई यशवंतराव फणसे यांचे निधन झाले. मुलगी मुक्ता सती गेली. वैयक्तिक आयुष्य प्रचंड
दुःखाचे असले, विपरीत घाव झाले तरी तब्बल 29 वर्षे अहिल्यादेवींनी रयतेचे अश्रू पुसत एकहाती राज्य केले. दुःखाचे डोंगर समोर असतानाही होळकरांचे दिवाण गंगाधर चंद्रचूड यांच्या सल्ल्यानुसार रघुनाथराव पेशवे यांचे आक्रमण अहिल्यादेवींनी मोठ्या चतुराईने परतवून लावले. ते ऐतिहासिक वाक्य सर्वांना माहीत आहे, मी हरली तर फारसा फरक पडणार नाही, पण आपण मराठी सत्तेचे अटकेपार झेंडे गाडणारे बाईकडून पराभूत झालात तर तुमची सर्वत्र अपकीर्ती, अवहेलना आणि कुचेष्टा होईल. यातील राजकारण रघुनाथरावांच्या लक्षात येताच त्यांनी सैन्याला माघारी पाठवले व मी युद्धाला नाही, तर आपल्यावर आलेल्या दुःखाच्या सांत्वनाला येत आहे, असा निरोप पाठवला.
अहिल्यादेवी आठवतात त्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. काठमांडूपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अखंड भारतात अनेक ठिकाणी अहिल्यादेवींनी केलेल्या कार्याचे दाखले मिळतात. ठिकठिकाणी विहिरी, घाट, मठ, मंदिरे, पाणपोया, अन्नछत्रे, अन्नशाळा, धर्मशाळा, संस्कारवर्ग, आश्रमशाळा, ग्रंथागार, यज्ञशाळा, यज्ञकुंड, तलाव हे सर्व लोकांच्या सोयी-सुविधेसाठीच. हे बनविण्यासाठी लागलेला पैसा हा त्यांनी त्यांच्या खाजगीतील संपत्तीमधून केला. याशिवाय अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. ईश्वराप्रति त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या मते ईश्वराने मला हे राज्य करण्याची जबाबदारी दिली आहे आणि याचे उत्तर मला ईश्वरालाच द्यायचं आहे म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने जनतेनेच सन्मानित केले. त्यांची ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी अंगीकारली तरी देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही. अहिल्यादेवींच्या या धोरणाचा परिणाम म्हणूनच माळवा प्रांतात शांतता, स्थैर्य, व्यापार, उद्योगधंद्यांचा विकास झाला. शेतीला प्राधान्य दिल्याने हा प्रदेश हिरवागार झाला. परकीय आक्रमणे किंवा दुष्काळ या कालखंडात शेतकर्यांना शेतसारा माफ असे. महत्त्वाचं म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अहिल्यादेवींनी शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक ते सर्व बी-बियाणे व साहित्य उपलब्ध करून दिले. धनसंपत्ती दिली नाही, पण कोणी उपाशी राहणार नाही याचीही काळजी घेतली.
राज्यातील जमिनीचे पाच भाग केले व एक भाग हा तेथील जनावरांसाठी राखून ठेवला. प्रजेचे गोमटे झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. कल्याणकारी राज्य निर्माण केले. प्रजेची काळजी पोटच्या पोरासारखी घेतली. प्रजा राजाहून मोठी आहे ही भावना जपली. आज आपण याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी चार ज्योतिर्लिंगांची निर्मिती अहिल्यादेवींनीच केली. याशिवाय इतर सर्व ज्योतिर्लिंगांना नवं रूप प्राप्त करून दिले. धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, कला, नीती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, नवीन कायद्यांची निर्मिती यावर अहिल्यादेवींनी काम केले. सोमनाथांचे मंदिर बांधले. असं म्हणतात की, साधारणतः 11 हजार मंदिरे बांधण्यात किंवा त्यांचा जीर्णोद्धार करण्यात अहिल्यादेवींचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी कुंभमेळ्यास राजाश्रय दिला. वेद पाठशाळाही सुरू केल्या. देशभर रस्ते बांधले. कलकत्ता ते काशी असा हमरस्ता तयार केला. रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावली. थोडक्यात, जगाला वंदनीय होईल असे कार्य केले. यातूनच असंख्य लोकांना रोजगार मिळाला. देशभरातील प्रतिभासंपन्न कारागिरांना माहेश्वरीत आमंत्रित केले. माहेश्वरी साडी उद्योगनिर्मितीचे व विविध उद्योगांचे केंद्र बनले. पुढे माहेश्वरी ही व्यापारी पेठ म्हणून नावारूपाला आले. कलाकारांना राजाश्रय दिला. अहिल्यादेवींनी ही कामे करताना स्थानिक सत्ता कोणाचीही असली, तरी तेथील राजसत्तेशी संवाद साधत मंदिरे बांधण्याची कामे पूर्णत्वास नेली. औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून मशीद बांधली होती. स्थानिक नवाबाशी चर्चा करून अहिल्यादेवींनी तेथे त्याच्याच बाजूला काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा बांधले. काशीला विद्यालय बांधले. धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, व्याकरण, गणित या विषयांचे पंडित त्याठिकाणी नेमले. त्यांनी भीमाशंकराचे मंदिर बांधले. जेजुरीला खंडेरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजही अहिल्यादेवींनी सुरू केलेल्या सर्व कामांसाठी लागणारा खर्च हा होळकरांच्या ट्रस्टमधून केला जातो. ब्रिटिश आमदनीतही तो याच पद्धतीनेच सुरू होता.
याशिवाय राज्यात हुंडाबंदी केली. सतीप्रथा कायद्याने बंद केली. शाहिरांना प्रोत्साहन दिले. लावणीतही भक्ती आणली. विविध कलांना उत्तेजन दिले. मराठीतील सर्वकालिक श्रेष्ठ कवी मोरोपंत अहिल्यादेवींच्या राजदरबारात होते. केदारनाथला अहिल्यादेवींनी धर्मशाळा बांधली. अशीच धर्मशाळा रामेश्वरलाही बांधली. या देशात पहिला सामूहिक विवाह सोहळा अहिल्यादेवींनी घडवून आणला. आज पाकिस्तानात असलेल्या कराचीजवळ शिवमंदिर बांधलेे, तर काठमांडूमधील पशुपतिनाथाच्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. या सर्वांचा परिणाम अगदी स्पष्ट सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाप्रमाणेच अहिल्यादेवींच्या कालखंडात शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ नाही आली. राज्य लोकांचे आहे आणि लोकांसाठी आहे यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती.
राज्यात दरडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. अहिल्यादेवींनी घोषणा केली, ‘जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी पत्नी म्हणून देईत’ आणि त्यानुसार यशवंतराव फणसे नामक युवकाने दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि अहिल्यादेवींनीही दिलेल्या शब्दाप्रमाणे आपली मुलगी मुक्ता हिचा त्याच्याशी विवाह लावून दिला. हा विवाह लावताना जात, धर्म, पंथ याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. राज्याच्या सीमेवर असणारे दरोडेखोर रामोशी, गौंड, भिल्ल या आदिवासींना विश्वासात घेऊन त्यांना राज्याच्या सीमावर्ती भागात सीमांचे रक्षणकर्ते बनविले. त्यांच्यासाठी भिलकवडी नामक कर सुरू केला. त्यांना नियमित वेतन सुरू केले. जे नागरिक हे काम करू शकत नव्हते त्यांना तेथील जमिनी कसण्यासाठी आपापसात वाटून दिल्या व उत्पन्नाचा एक भाग सरकारात जमा करण्यास सांगितले. अहिल्यादेवींची राहणी अतिशय साधी होती. सतत सफेद वस्त्र परिधान केले. कधीही अलंकार वापरले नाहीत, पण समस्त भारताला आपल्या कामाने अलंकारिक करून सोडले. माहेश्वरीत एका घोंगडीवर बसून त्या राज्यकारभार करीत. रोज पहाटे पाच वाजेपासून त्यांच्या कामाला सुरुवात होई, तर संध्याकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू असे.
– प्रा. प्रशांत शिरुड
निफाड : प्रतिनिधी मुख्य बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जाणारा रस्ता धामोरी -कोपरगाव या…
दोन वाहनांसह 12 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत सिन्नर ः प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर…
धुळे : धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात असलेल्या…
भालजवळ कारवाई, दोघे अटकेत, गुन्हा दाखल शहापूर ः प्रतिनिधी उल्हासनगरजवळच्या भाल येथील सीताराम म्हात्रेनगर या…
शिर्डी : दर्शन घेऊन घरी परत जाताना काळाने घाला घातला. कारला अचानक आग लागल्यामुळे एका…
नाशिक : प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील द्वारका…