आपत्ती व्यवस्थापनाची शहरात ‘हाय अलर्ट’ यंत्रणा; उत्खननामुळे निसर्गाचा कोप
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरालगत ब्रह्मगिरीच्या पोटाशी असलेल्या जांबाची मेट येथे जमिनीला पडलेली भेग भविष्यात मोठ्या भूस्खलनाचे संकेत देत आहे का? याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी प्रशासनाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांना पाचारण केले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने त्र्यंबक नगरपरिषद शहरात हाय अलर्ट यंत्रणा बसवण्याच्या
तयारीत आहे.
शहर आणि परिसरात डोंगर-टेकड्यांवर खासगी व शासकीय कामांसाठी सुरू असलेले बेसुमार उत्खनन, नियमांचे उल्लंघन करून उभ्या राहणार्या टोलेजंग इमारती, जमिनींचे सपाटीकरण आणि नद्या-नाल्यांचा आवळला जाणारा श्वास यामुळे निसर्गाचा कोप अटळ मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात येणारा गाळाचा पूर हा याच मानवनिर्मित चुकांचा परिणाम आहे. सिंहस्थ उपसा योजनेसाठी जलवाहिनीचे झालेले खोदकाम आणि पाणीपुरवठा वाढीव योजनेच्या उत्खननाने परिस्थिती अधिक बिकट केली आहे. भूमाफियांनी बेकायदेशीरपणे डोंगर-टेकड्यांचे केलेले सपाटीकरण आणि नैसर्गिक ओढ्यांचे बदललेले मार्ग यांमुळे नव्याने बांधलेले घाट आणि साधूग्रामसाठी प्रस्तावित जागा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील पावन गणपती मंदिर परिसरातून येणारे पाण्याचे प्रचंड लोट नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्ये शिरले होते. खोदकामाच्या खोलीवर मर्यादा घालणे, नैसर्गिक प्रवाहांची दिशा बदलणे, सपाटीकरणात भर टाकणे आणि टेकड्या तोडण्यावर तात्काळ बंदी घातली नाही, तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल.
Risk of landslides at Trimbakeshwar; geologists to conduct a study.