संपादकीय

हत्ती वाचवा, पर्यावरण वाचवा

ऑगस्ट हा दिवस जगभर जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात हत्तींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्वचा आणि हस्तिदंती वस्तूंसाठी तस्करांकडून हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. एका अंदाजानुसार दररोज अवैध शिकारीमध्ये किमान 100 हत्ती मारले जातात, म्हणून वर्ल्ड एलिफंट फाउंडेशनने 2011 पासून 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिवस अर्थात वर्ल्ड एलिफंट डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
या दिवसाचे औचित्य साधून हत्तीचे पर्यावरणीय तसेच जीवशास्त्रीय महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात येते. जगभरात आफ्रिका आणि आशियायी देशांत हत्तींची संख्या सर्वाधिक आहे. जगातील 90 टक्के हत्ती या दोन खंडातच आढळतात, पण आता या दोन खंडांतही हत्तींचे प्रमाण घटू लागले आहे. अवैध शिकारींवर जर वेळीच अंकुश लावला नाही तर पृथ्वीवरून हत्ती नामशेष होऊ शकतात आणि जर पृथ्वीवरून हत्ती नामशेष झाले तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो. पृथ्वीवरून हत्ती नामशेष झाले तर पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड या वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
हत्ती कमी झाल्यास निर्माण होणार्‍या धोक्यासंदर्भात सेंट लुईस विद्यापीठातील संशोधकांनी केलेले संशोधन नेचर जिओ सायन्स या नियतकालिकेत छापून आले होते. हे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरातील पर्यावरण व वन्यजीवप्रेमींनी हत्ती वाचवा मोहीम हाती घेतली. जगभरात ही मोहीम आता जोर धरू लागली आहे. पृथ्वीवरील सर्वांत महाकाय व सर्वांत बलवान शाकाहारी प्राणी म्हणून हत्तींची गणना होते. हत्तीच्या प्रचंड वजनदार आकारमानामुळे जंगलात एकप्रकारे ते बुलडोझरचे काम करतात. त्यांच्या या चालण्यामुळे ते जंगलात नव्या वाटा निर्माण करतात. गवत व विविध वृक्षवेलींच्या परागीभवनात हत्तींच्या हालचालींचा मोठा वाटा असतो. ते गवत तुडवतात. विविध जातींच्या झाडांची फळे आणि पाने खातात. काही वेळा ते जंगलातील वठलेली झाडे धक्का देऊन पाडतात. या सगळ्यांच्या त्या जंगलाच्या वनक्षेत्राच्या इकोसिस्टिमवर परिणाम होत असतो. हत्ती जंगलात असल्यामुळे झाडांची संख्या नियंत्रणात राहते. जंगलात वेगाने वाढणार्‍या वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असतात. विशेषतः आफ्रिकेतील हत्तींबाबत करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, हत्ती अशा वेगाने वाढत असलेल्या वनस्पतींची पाने खात असल्याने वातावरणात सोडण्यात येणारा कार्बन डायऑक्साइड कमी प्रमाणात सोडला जातो.
मध्य आफ्रिकेतील कांगो प्रजासत्ताकाच्या अखत्यारीत येत असलेल्या जंगलात याबाबत संशोधन केले असता, वरील निष्कर्ष संशोधकांनी काढले आहे. त्यामुळे हत्तींची संख्या वाढत राहिली तरच वातावरणातील प्राणवायू टिकून राहील आणि कार्बनचे प्रमाण कमी होईल हे जाणूनच पर्यावरण आणि वन्यजीवप्रेमींनी हत्ती वाचवा मोहीम सुरू केली आहे.
हत्ती वाचवणे ही काळाची गरज आहे. या मोहिमेत सर्व देशांनी सहभाग नोंदवायला हवा. पर्यावरण वाचवायचे असेल आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करायचे असेल तर हत्तींची अवैध शिकार रोखली पाहिजे. हत्तींची शिकार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. हत्ती वाचेल तरच वातावरण वाचेल, पर्यावरण वाचेल. हत्ती वाचवा, पर्यावरण वाचवा.

Gavkari Admin

Recent Posts

तब्बल 80 ते 90 लाख टन कांदा होतोय खराब

पाशा पटेल : साठवणुकीसाठी कार्यक्षम धोरणाची आवश्यकता लासलगाव : वार्ताहर साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान तब्बल 80…

2 hours ago

तिरळेपणा ः गैरसमज

पूर्वीपासून तिरळेपणाकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपण…

3 hours ago

मुलांच्या सवयी आणि आरोग्य

(भाग 8) आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले असले, तरी त्याचवेळी त्याने अनेक नव्या…

3 hours ago

इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेक्यांचा हल्ला?

मॉकड्रील असल्याने प्रेस कामगारांनी सोडला सुटकेचा निःश्वास नाशिकरोड : वार्ताहर सायंकाळी प्रेस सुटण्याच्या दरम्यान अचानकपणे…

3 hours ago

नाशिकमध्ये ’महिंद्रा’चा नवीन मेगा प्रकल्प

ना. उदय सामंतांची निमात घोषणा नाशिक : प्रतिनिधी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी…

4 hours ago

‘गिरणा’तून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी 1500 क्यूसेक विसर्ग

पळाशी : वार्ताहर नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा…

4 hours ago