घटलेल्या पटसंख्येवरून भुसेंकडून खरडपट्टी

मनपा शिक्षण विभागाला महिनाभराचा अल्टिमेटम; आढावा बैठकीत अधिकार्‍यांची घेतली शाळा

नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट शाळांसाठीच्या कामांसाठी 52 कोटींचा खर्च करूनही महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढत नसून, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचताही येत नसल्याचे यापूर्वी आपल्या निदर्शनास आले आहे. कारणे सांगून अपयश न झटकता रिझल्ट हवा, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि. 13) महापालिकेच्या शिक्षण विभागाला सुनावत घटलेल्या पटसंख्येवरून खरडपट्टी काढली.
नाशिक महापालिकेत मंत्री भुसे यांनी शुक्रवारी (दि.13) शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येत्या काही दिवसांत पटसंख्या वाढविण्याबरोबरच खासगी शाळांप्रमाणेच मनपा शाळांत शिक्षण द्यावे. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, प्रदीप चौधरी, उपायुक्त (प्रशासन), लक्ष्मीकांत साताळकर, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसेे म्हणाले, की यापूर्वी मनपा शाळांमधील पटसंख्या चाळीस हजारांच्या पुढे होती. त्यात कमालीची घट होऊन 32 हजारांवर पटसंख्या येऊन अडकली असून, शिक्षण विभागासाठी निराशाजनक चित्र असल्याचे सांंगत उपस्थितांची शाळा घेतली. राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद आहे. नाशिकमध्ये खासगी शाळांत पैसे भरून मुलांना टाकले जाते. मनपा शाळांबाबत पालकांचा आग्रह असायला हवा. नाशिकमध्ये महापालिका शाळांसाठी खूप संधी असून, त्यानुसार नियोजन करावे. गुणवत्ता सुधारण्यासाठी मंत्र्यांनी मनपा शिक्षण विभागाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण तारांगण, शेतावर, दादासाहेब फाळके स्मारक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली न्यायला हव्यात. शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांनी केल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती मंत्री भुसे यांना दिली.

आकडेवारीची लपवालपवी करू नका

बैठकीच्या प्रारंभीच मंत्री दादा भुसे यांनी मनपा शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्याकडे मागील पाच वर्षांतील पटसंख्येची आकडेवारी मागितली. मात्र, ती आणली नसल्याने ती काढण्यास सांगितले. एक तासाने पटसंख्येची आकडेवारी आली, परंतु मंत्री भुसे यांना ही आकडेवारी खटकल्याने त्यांनी आकडेवारीची लपवालपवी करू नका, असे म्हणत संताप व्यक्त केला.

शिक्षकांनी त्यांच्या मुलांना मनपा शाळेत टाकावे : आ. दराडे

महापालिकेत अतिरिक्त शिक्षक असूनही शाळांमधील पटसंख्या वाढविण्यात अपयश का येते, असा सवाल शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित केला. मनपा शिक्षकांनी त्यांच्या मुलांना महापालिकेच्या शाळेतच टाकावे. तसेच पटसंख्या वाढीसाठी शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना मनपा घरपट्टी, पाणीपट्टी माफ करता येईल का? हे तपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

शिक्षकांवर लक्ष ठेवणार डायरी

महापालिकेतील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, याकरिता आता प्रत्येक शाळेतील शिक्षकावर प्रशासनाचे लक्ष असेल. शिक्षकांनी दिवसभरात काय शिकवले, याची नोंद त्यांना दैनंदिन डायरीत करावी लागणार आहे. संबंधित विषय खरंच शिकवला असेल तर त्या विषयासमोर विद्यार्थ्यांच्याही स्वाक्षर्‍या असतील. प्रत्येक शाळेला भेटी देऊन वेळोवेळी पाहणी केली जाणार आहे, असेे अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी मंत्री भुसे यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *