पाळेमुळे खोदण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ढोंगी साधूंवर कडक
कारवाईचा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे स्पष्ट केले असून, या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.
जे पीडित किंवा फसवणूक झालेले नागरिक स्वतःहून पुढे येत आत्मविश्वासाने माहिती देत आहेत. त्यामुळे खरातची पाळेमुळे खोदल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामिनारायण मंदिर येथे आयोजित अखिल भारतीय संत सेवा समितीच्या दोनदिवसीय बैठकीचे आयोजन (दि. 4, 5) करण्यात आले होते. बैठकीच्या दुसर्या दिवशी (दि. 5)त्यांनी माध्यमांसमोर माहिती दिली.कुंभमेळ्यात कोणत्याही प्रकारच्या ढोंगी साधूंना प्रवेश दिला जाणार नाही. खरात प्रकरणातून सर्वांनी धडा घ्यावा, कारण लोकांच्या आस्थेचा गैरवापर करून संतपरंपरा आणि सनातन विचारांना कलंकित करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. खरात प्रकरणाचा तपास सुरू असून, विविध बँकांमध्ये अनेक खाती उघडल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे तपासाला वेग आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 12 गुन्हे दाखल झाले असून, दररोज नवी माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष तपास पथक चांगले काम करत असून, नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालया(ईडी)मार्फत चौकशी होणार असून, त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरातच्या गैरकृत्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना, कॉल डिटेल रेकॉर्ड केवळ तपास यंत्रणांनाच मिळू शकतात, त्यामुळे अशा प्रकारचा अहवाल कसा लीक झाला याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा ठोस पुराव्यांवरच कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून, पंचनामे करून त्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
The culprits in the Kharat case will not be released.