रुई रस्ताप्रश्नी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

शासनाला दोन दिवसांची मुदत; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

निफाड : तालुका प्रतिनिधी
जुना रुई ते खेडलेझुंगे रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्ताकामास तातडीने मंजुरी मिळून काम सुरू करावे, या मागणीसाठी रुई येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. येत्या दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रुई येथील जिल्हा परीषद मार्ग क्र.266, कि.मी. 11 ते 13 या जुना खेडला रस्त्याचे गत वीस वर्षांपासून काम झालेले नाही. या रस्त्यालगत दाट लोकवस्ती आहे. हा रस्ता दळणवळण, शेतमाल वाहतूक व शालेय विद्यार्थ्यांना जाणे-येण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी व उपचारासाठी जाण्याकामी फार उशीर होतो, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्याच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, आमदार यांना पत्रव्यवहार तसेच लेखी निवेदन देऊनही अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून, न्याय मिळत नाही म्हणून दि.19 नोव्हेंबरपासून रुई, धानोरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रामदास तासकर यांच्या नेतृत्वाखाली अंकुश तासकर, विलास गायकवाड, बापू रोटे, नीलेश रोटे, बापू तासकर, लीलाबाई बोरगुडे, संतोष तासकर, शोभा रोटे, संदीप रोटे, सुनील तासकर, बाळासाहेब गायकवाड, वैभव तासकर, लखन तासकर, महेश झुरळे, योगेश रोटे, बापू गायकवाड, राजू बोरगुडे, पिराजी तासकर, सुनील शिंदे, केदारनाथ तासकर, माधव रोटे, पुंजाराम तासकर, दत्तात्रय कणसे, संजय तासकर, शरद तुपे, ओम बोरगुडे, किरण तासकर, भाऊसाहेब
तासकर, भागवत वाघ, चंद्रभान तुपे आदींसह आमरण उपोषण सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असून, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक लासलगाव यांना देण्यात आल्या आहेत.

या आहेत मुख्य मागण्या

जुना रुई ते खेडलेझुंगे बोरमाथा रस्त्यास त्वरित मंजुरी मिळावी, या रस्त्याचे अतिक्रमण काढून सुरळीत करण्यात यावा, ठिकठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतातील पाणी निघण्यास सिमेंट पाइप टाकण्यात यावे, रस्त्याच्या कामात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी साइड गटार (नाली) करण्यात याव्यात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *