सिन्नर : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे, तर पशुपक्षी आणि शेती पिकांनाही बसत आहे. विशेषतः फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत असून,
फुलगळ, फळगळ आणि उत्पादन घटण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत घोटेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सुनील साईनाथ घोटेकर (40) यांनी आपल्या डाळिंबबागेसाठी केलेला अभिनव प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
घोटेकर यांनी आपल्या सुमारे सहा एकर क्षेत्रातील डाळिंबबागेवर पांढर्या कापडी आच्छादनाचा वापर केला आहे. या आच्छादनामुळे संपूर्ण बाग जणू पांढर्या शालूने नटल्याचे आकर्षक दृश्य निर्माण झाले आहे. मात्र, या प्रयोगामागे केवळ सौंदर्य नसून, शास्त्रीय दृष्टिकोनातून उष्णतेचा परिणाम कमी करण्याचा हेतू आहे.
पांढर्या कापडामुळे सूर्यप्रकाशाची थेट तीव्रता कमी होते आणि बागेतील तापमान काही अंशी नियंत्रित राहते. परिणामी, झाडांवरील उष्णतेचा ताण कमी होतो. यामुळे फुलांची गळती कमी होऊन फळधारणा टिकून राहण्यास मदत होते. विशेषतः डाळिंबासारख्या नाजूक पिकांसाठी हा उपाय उपयुक्त ठरत असल्याचे घोटेकर यांनी सांगितले.
The pomegranate orchard has woven a ‘white shawl’