राऊतांच्या टीकेनंतर मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडालेल्या ’भोंदू’ अशोक खरात प्रकरणात अखेर राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी, विशेषतः खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांनी तटकरे यांच्या ’मौना’वर कडक शब्दांत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, बुधवारी (दि. 1 एप्रिल) त्यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध करत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
अशोक खरातवर झालेल्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांवर भाष्य करताना आदिती तटकरे म्हणाल्या, की अशोक खरात प्रकरण हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि अशा भोंदूगिरीला येथे थारा नाही. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, हे प्रकरण सर्व राजकीय मंडळींसाठी आणि भविष्याचा सल्ला घेणार्यांसाठी एक मोठा धडा आहे.
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर
खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री या विषयावर गप्प का? असा सवाल विचारत आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाल्या, की मी या विषयावर गप्प होते, हा आरोप चुकीचा आहे. यापूर्वीही मी वेगवेगळ्या तीन ते चार व्यासपीठांवर माझी भूमिका स्पष्ट केली होती. केवळ राजकीय फायद्यासाठी कोणाच्या तरी नावावर ’फुली’ मारणे किंवा वैयक्तिक बदनामी करणे थांबवले पाहिजे.
अशोक खरातच्या डायरीतील कथित ’हिटलिस्ट’ आणि राजकीय नेत्यांशी असलेले संबंध यांमुळे हे प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. आता आदिती तटकरे यांच्या या जाहीर भूमिकेनंतर विरोधक काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्दे
भूमिका : खरात प्रकरणाचे कोणतेही राजकीय समर्थन नाही. हे कृत्य घृणास्पद.
टीकेला उत्तर : संजय राऊत आणि अंजली दमानिया यांच्या ’मौन’ बाळगल्याच्या आरोपांचे खंडन.
तपास : एसआयटीच्या तपासावर पूर्ण विश्वास, पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन.
आवाहन : राजकीय नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकांची बदनामी टाळावी.
फोटो आणि राजकीय कनेक्शनवर स्पष्टीकरण
अशोक खरातसोबत अनेक बड्या नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्याबद्दल त्या म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक लोक भेटायला येतात आणि फोटो काढतात. पण फोटो काढला म्हणजे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक कृत्यांचे समर्थन केले, असा त्याचा अर्थ होत नाही. जर आम्हाला खरातच्या या कृत्यांची पुसटशीही कल्पना असती, तर महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी त्याला भेटला नसता, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
एसआयटी चौकशीवर विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. यावर समाधान व्यक्त करताना तटकरे म्हणाल्या की, एका सक्षम महिला अधिकार्याकडे हा तपास असल्याने पीडित महिलांना नक्कीच न्याय मिळेल. सरकार या प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि सत्य समोर आणेल.
The silence on the Kharat case has finally been broken.