राडा करायला ठाकरे सेनेत कुणी उरलेच नाही : ना. महाजन

नाशिक : प्रतिनिधी
ज्याला जायचे त्याने जा म्हणायचे आणि गेल्यावर राडा करण्याची धमकी द्यायची, याला राजकारण म्हणत नाही. लोकांची काळजी घेता आली नाही तर काय होते, हे या परिस्थितीवरून स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी नाशिक येथील मतदान केंद्रावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पक्षातून आधी खासदार गेले, आता आमदार आणि नगरसेवकही जाण्याच्या मार्गावर आहे, असा सूचक इशाराही महाजन यांनी यावेळी दिला.
सकाळपासून होणार्‍या निरर्थक बडबडीला आता सर्वजण वैतागले आहेत. पक्षप्रमुखांनी त्यांना वेळीच आवरण्याची गरज आहे. ते जेव्हा पक्षातून बाहेर पडले, तेव्हाच मी सांगितले होते की, हा ह्युमन बॉम्ब आहे, जो पक्षाचेच नुकसान करेल, अशी घणाघाती टीका नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर करण्यात आली. तसेच, या सकाळच्या बडबडीमुळेच पक्ष संपण्याच्या मार्गावर असून, याचा फायदा आम्हाला होईल, असा टोलाही महाजन यांनी लगावला. आमचा आमच्या मतदारांवर, लोकप्रतिनिधींवर पूर्ण विश्वास आहे. केवळ काळजी घ्यायची म्हणून आम्ही लोकांना भेटतो, सहलीला किंवा पर्यटनाला नेतो. पण, इथे तरलोकांना स्वतःच पक्षातून हाकलून दिले जाते आणि मग ते गेल्यावर धमक्या दिल्या जातात. खाली जमिनीवर राहून काम करावे लागते, ज्याला जायचे त्याने जा तुम्हाला थांबवणार नाही, गरज नाही अशा भूमिकेने पक्ष चालत नसतो, असा टोला ठाकरे गटाला लगावला.

पक्ष काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला
बाळासाहेब ठाकरे असतानाची गोष्ट आणि काळ पूर्णपणे वेगळा होता. आता हा पक्ष काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आहे. त्यांच्याबरोबर केवळ थोडे चाललात तरी तुमची हक्काची व्होट बँक निघून गेली आणि त्याचाच मोठा फटका निवडणुकीत बसला. यापुढील काळात पक्षाला आणखी वाईट जागा मिळतील. इतकेच नव्हे तर, शिवसेना आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाल्यामुळेही लोकप्रतिनिधी पक्षातून निघून जात आहेत, असे महाजन म्हणाले.

वाजे यांची भेट घेऊन शंका दूर करणार
खा. वाजे यांची कुंभमेळा बैठकीबाबत नाराजी असेल तर मी स्वतः वाजे किंवा संबंधित पदाधिकारी यांची भेट घेणार असून, त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या जातील, असे सांगत नाराज कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

There is no one left in the Thackeray Sena to create a ruckus: Minister Mahajan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *