25 जूननंतर राज्यात पावसाची गती शक्य
♦ कोकणात जूनअखेरीस चांगल्या पावसाचा अंदाज
♦ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट
सिन्नर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून मान्सूनची वाटचाल ठप्प झाली असून, राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती मंदावली असून, 23 जूननंतर वातावरणात बदल होऊन मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.
8 जून रोजी तळकोकणातील हर्णाई ते सोलापूरपर्यंत पोहोचलेला मान्सून अद्याप त्याच परिसरात स्थिरावलेला आहे. वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील प्रत्यावर्ती वार्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सून प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण होत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या अंदाजानुसार, 25 जून ते 1 जुलैदरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात मान्सून सक्रिय होऊन चांगल्या पावसाची शक्यता आहे. सह्याद्री ओलांडल्यानंतर हा मान्सून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पोहोचू शकतो.
विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील मान्सूनची प्रगती बंगालच्या उपसागरातील शाखेवर अवलंबून राहणार आहे. ही शाखा सध्या काहीशी मंदावली असली तरी जूनच्या अखेरच्या आठवड्यात ती पुन्हा सक्रिय होऊन त्या भागात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.
चार दिवस उष्णतेची लाट
दरम्यान, 16 ते 19 जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती जाणवू शकते. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानासह रात्रीचा उकाडाही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पेरण्या रखडणार
अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून वार्यांना अपेक्षित बळ मिळत नसल्याने दमदार पाऊस आणि पेरणीयोग्य ओलावा मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित पावसाच्या स्थितीनंतर आणि 1 जुलैनंतरच्या वातावरणीय बदलांनुसार पुढील चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
Wait for the monsoon continues for another week.