नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम

सन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात पक्षी वाचवा, घरटी वाचवा अभियान सुरू करण्यात आले असून, त्यातूनच 140 विद्यार्थ्यांनी चिऊताईसाठी वेगवेगळ्या आकाराची घरटी बनविली आहेत. याशिवाय, विद्यालयाच्या आवारात ही घरटी ठेवून तेथे दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भूतदयेचा विचार विद्यार्थ्यांच्या अंगी रुजला गेल्याने त्यांनी पक्षी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
निसर्गाची प्रथम ओळख मानवाला चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा सांगतच आपली आई आपणास एक एक घास भरवते. अंगणात, गॅलरीमध्ये दाणे टिपणारी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी होत चालली आहे. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. ही बाब हेरून शहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या दाबाचे तंत्र आणि धान्य फीडर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपापल्या कल्पनांनुसार सुंदर घरटी बनवली आहे. यासाठी पत्रा, पुठ्ठा, खोकी, प्लास्टिकचे डबे, पाचट, गवत, झाकण, पाइप आदींचा खुबीने वापर करण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने बनवलेल्या घरट्यावर स्वतःचे नाव टाकून ही घरटी विद्यार्थ्यांनी झाडे, शालेय परिसर, वरंड्यात लावली आहेत. विद्यार्थी दररोज पक्ष्यांना या घरट्यांमध्ये दाणापाण्याची सोय करत आहे. ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी, धान्य उपलब्ध होत नाही म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. घराच्या परिसरातही घरटे बनवून लावणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमास उपशिक्षिका बरखा साळी, भारती खंबाईत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे घरटे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्राचार्य नामदेव कानसकर, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे, आर. जे. थोरात, व्ही. व्ही. पाटील, पी. एस. बधान, क्रीडाशिक्षक एस. टी. गुरुळे, आर. पी. गवळी, अलका कोतवाल, बाळासाहेब कुमावत, नवनाथ पाटील, दत्तात्रय आदिक, गणेश मालपाणी, प्रा. सचिन रानडे, प्रा. रवींद्र डावरे, प्रा. अमोल व्यवहारे, वरिष्ठ लिपिक व्ही. के. ठोक, जगन शिंदे, सुनील तासकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा

पशुपक्षी हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. पक्ष्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी विद्यालयात एक विद्यार्थी-एक घरटे असा उपक्रम हाती घेतला आहे.
-नामदेव कानसकर, मुख्याध्यापक, भैरवनाथ हायस्कूल, शहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *