अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’
या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष उलटत असतात. आणि मग कुणीतरी घरातील प्रौढ व्यक्ती म्हणते, अगं कॅलेंडर पाहिलंस का? यावर्षी अधिक महिना आहे बरं का!
वर्ष तर बारा महिन्यांचे, मग हा तेरावा महिना कुठून आला, असा प्रश्न लहान मुलांनाच काय तरुणांनाही पडतो. सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी दहा दिवसांचा फरक पडत असतो म्हणून पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना ‘अधिक’ धरून काळमेळ बसविला जातो. तो अधिक महिना म्हणजेच ‘पुरुषोत्तम’, ‘अधिक’ किंवा ‘धोंड्याचा’ महिना म्हणून संबोधला जातो.
या महिन्यात जप, व्रतवैकल्ये, दानधर्म करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आपली संस्कृती त्यागाला आणि दान देण्याला महत्त्व देते. ‘दिल्याशिवाय मिळत नाही आणि पेरल्याशिवाय उगवत नाही’ हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून त्याग करायला शिका, दान करायला शिका, दान सत्पात्री करा, असे सांगितले गेले आहे.
अधिक महिना सामान्यतः 33 महिन्यांनी येत असल्याने या दिवसात 33 अनारशांचे किंवा बत्ताशांचे दान करावे, असे म्हणतात. काही लोक धेनूचं दान तर काही लोक दीपदान करतात.आपल्याकडे जावयाला विष्णूरूप मानून त्याला आहेर करण्याची, भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळे अधिक मास सुरू होताच सासू-सासर्‍यांची आपल्या जावयाला खूश ठेवण्यासाठी लगबग सुरू होते आणि मग अनेक जण आपल्या कन्येला आणि जावयाला अधिक वाण देण्याचा कार्यक्रम करतात.
अधिक महिन्यासंबंधी हे विचार चक्र डोक्यात चालू असताना मला आमच्या लग्नानंतरचा पहिला ‘अधिक’ महिना आणि तो आई-बाबांनी केलेला ‘सोहळा’ आठवला. त्यावेळी माझ्या आई-बाबांनी जावयाला चांदीच्या ताटामधून 33 अनारसे आणि मला सुंदर भारी साडी दिली होती. हे आठवण्याचं कारण म्हणजे आता माझ्या मुलीचा पहिला ‘अधिक’ सण मला साजरा करायचा आहे ना!
मला तर टेन्शन आलं बाई! आपले पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केले आहे की, सोने-चांदी एक वर्षभर खरेदी करू नका. मग हे चांदीचे ताट कसे देणार? सोने-चांदी किती महागले आहे आणि मग नाही दिले तर जावई आणि विशेष म्हणजे त्यांची आई रुसून बसतील तर काय करायचे? यातून मार्ग कसा काढायचा, यासाठी शेवटी मी माझ्या मैत्रिणीला, शुभदाला घरी बोलावले. दरवेळेला अडचणीत ती मला योग्य सल्ला देऊन माझी अडचण दूर करते.
मग काय आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या.
शुभदा ः अगं समिधा, सध्या जगातील काही महत्त्वपूर्ण देश हे गेले काही महिने युद्धात गुंतलेले असल्याने सगळ्या जगामध्ये फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर देशांच्याकडे बघता आपल्या देशाची स्थिती, आर्थिक व्यवस्था खूपच चांगली आहे. जे देश जगाला (तेल) क्रूड ऑइल पुरवतात तेच देश युद्धामध्ये गुंतलेले असल्याने जगातील सर्वच देशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचमुळे आपणही भारतीयांनी थोडं काटकसरीने वागणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आपल्या पंतप्रधानांनी मोदीजींनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले आहे.
1) इंधन बचत करा, त्यासाठी सार्वजनिक वाहनांचा, मेट्रोचा, बसेसचा वापर करावा.
2) एक वर्षभर सोने-चांदी घेण्याचे टाळावे.
3) सर्वांच्या सोयीसाठी वर्षभर वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
आपल्या पंतप्रधानांनी कळकळीने भारतवासीयांना हे आवाहन केले आहे. तो आदेश किंवा कायदा नाही. आपल्या सर्वांच्या हितासाठी मोदीजींनी केलेले आवाहन आपण सर्वांनी पाळणे हे आपल्या देशहितासाठी कर्तव्य आहे.
शुभदा, तू म्हणतेस ते खरे आहे. पण अधिक वाण देण्यासाठी मला काही पर्याय सुचव ना.
हे बघ समिधा, आपल्याला सोने-चांदी बाहेरील देशांमधून आयात करावे लागते आणि त्याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये द्यावी लागते. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीचे भाव जागतिक बाजारपेठेत प्रचंड वाढले आहेत आणि त्यामुळे सोने-चांदीच्या आयातीवर भारत सरकारने आता निर्बंध लादले आहेत. आणि अशा परिस्थितीत जावयाला चांदीचे ताट देण्याचा विचार तू सोडून दे समिधा. बोलण्यापेक्षा कृतीवरती भर दे समिधा आणि द्यायचंच असेल तुला काही तर, लेक-जावयांना हवी तेवढी रुपयांची एफ.डी.करून दे. हा सेफ अन् सोपा मार्ग आहे.

 

The month of Adhik is called the ‘Purushottam’ month.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *