‘पूर्णांगिनी’साठी दृष्टिकोन बदलेल?

काळ बदलला, नजर का नाही?

एक स्त्री जेव्हा विधवा होते, तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटतं, पण फक्त तेच तुटतं असं नाही…
तुटतात तिच्या आयुष्याच्या अनेक शक्यता, तुटतो तिचा आत्मविश्वास आणि फार वेळा तुटतो समाजावरचा विश्वास.
आपण ऐकलेले आहे, पाहिलेलेही-
पूर्वीच्या काळात एखादी स्त्री विधवा झाली, की तिचं कुंकू पुसलं जाई, मंगळसूत्र तोडलं जाई, बांगड्या फोडल्या जात आणि तिला सफेद साडीत जीवन जगायला लावले जाई.
तिला सण-उत्सव, लग्नकार्य, पूजाअर्चा यांपासून दूर ठेवण्यात येत असे.
तिचा चेहरा बघणंही अशुभ समजलं जात होतं. हे सगळं पतिव्रता संकल्पनेच्या नावाखाली झालं, पण ह्याच पतीच्या मृत्यूनंतर तिचं संपूर्ण आयुष्य शेवटचं ठरवलं गेलं.
आणि आज… म्हणजे 21 व्या शतकात-वर्ष 2025 मध्ये?
काल बदलला, समाज शहरी झाला, स्त्रिया शिकल्या, नोकर्‍या करू लागल्या. पण नजर अजूनही बदलली नाही.
आज जर एखादी तरुण स्त्री विधवा झाली- मग ती सिंगल पेरेंट असेल, एकटी राहणारी असेल किंवा स्वतःची जबाबदारी स्वतः घेणारी असेल, तरी समाजाची नजर तिच्याकडे संवेदनेने नव्हे, तर शंकेने, तुच्छतेने किंवा कुजबुजीने पाहते.
अशा असंख्य बिनडोक आणि कटू नजरा तिच्या आयुष्याचा भाग बनतात.
आजच्या तरुण स्त्रिया काही ठिकाणी अत्यंत सशक्त ठरल्या आहेत. त्या करिअर करतात, निर्णय घेतात, अपत्य सांभाळतात आणि समाजाच्या दबावाला तोंडही देतात. त्या स्वतःचं मानसिक, आर्थिक आणि सामाजिक सामर्थ्य सिद्ध करतात. पण… अजूनही काही स्त्रिया समाजाच्या नजरेला घाबरतात. त्या स्पष्टपणे विरोध करू शकत नाहीत, स्वत:चं मत मांडू शकत नाहीत, दडपशाही झेलत राहतात. कारण त्या समाजाच्या आणि घरच्या दडपणात पिचल्या आहेत.
विधवा स्त्रीला केवळ सहानुभूती नकोय. तिला सन्मानाची वागणूक हवी आहे.
तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल, पण तिच्या मनात कौटुंबिक जबाबदारीचं आणि आत्मनिर्भरतेचं सोनं आहे.
ती विधवा आहे म्हणून तिचं आयुष्य थांबत नाही- अनेकदा तीच स्वतः, स्वतःचा
आधार बनते.
विधवा दिन फक्त आठवण काढण्याचा दिवस नसावा. तो असावा समाजमन जागं करण्याचा दिवस.
अशा स्त्रियांना दया नको, सन्मान हवा.
त्यांचं दुःख पाहून बिचारी म्हणण्यापेक्षा, त्यांचं सामर्थ्य पाहून वाहवा म्हणण्याची गरज आहे.
आज जर एखादी विधवा मंगळसूत्र न घालता जगते आहे, तर त्यात तिचं सौभाग्य नाही कमी झालं- तिचं मूल्य तितकंच आहे… कदाचित जास्त!
मंगळसूत्र नसलेली स्त्री ही दु:खी नसते, ती स्वतःच्या जीवनाची माळ स्वतः गुंफणारी स्त्री असते.
काळ बदलतो, कपडे बदलतात, परंपरा बदलतात…
पण दृष्टिकोन कधी बदलेल?                                    – प्रा. शीतल कारे   सीएमसीएस कॉलेज

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *