जिल्ह्यातील धरण समूहात 25.64 टक्के जलसाठा

गंगापूर धरणात दीड टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात मे महिन्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण समूहात अंशतः वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 2,525 दलघफू अर्थात, 45.31 टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात 2,501 दलघफू अर्थात, 44 टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.
गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत दीड टक्क्याने, तर जिल्ह्यातील धरण समूहातही एक टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात दि. 9 जून रोजी जिल्ह्यातील धरण समूहात 16 हजार 844 दलघफू पाणीसाठा अर्थात, 24.59 टक्के साठा शिल्लक होता.
आता एक टक्क्याने वाढ होऊन 16 हजार 834 दलघफू साठा अर्थात, 25.64 टक्के पाणीसाठा आहे.
अवकाळीने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असला, तरी धरणाच्या पातळीत मात्र वाढ झाली.
मे महिन्यात उन्हाच्या काहिलीने जिल्ह्यातील धरणांंच्या पातळीत वेगाने घट होत होती. मे महिन्याच्या मध्यावर धरणांंत 28 टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यानंतर तीन टक्क्यांनी पाणीपातळीत घट झाली होती. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या धरण समूहातील पातळीत वाढ झाली आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण समूहात काहीअंशी पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नाशिककरांवरचे पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.

आजचा उपयुक्त पाणीसाठा क्षमता
मोठे प्रकल्प        –     07 48,004
मध्यम प्रकल्प    –      17 17,660
9 जूनची स्थिती –     16,844-25.64 टक्के
एकूण                –       24 65,664

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *