धरणातील विसर्ग : दारणा : 4742, गंगापूर – 1000
पुराच्या पाण्यात दोन जण बेपत्ता, जनजीवन विस्कळीत
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून संततधार सुरू असून, पावसाने धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गोदावरीला या हंगामातील पहिलाच पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी लागले होते. धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रशासनाने विसर्ग सुरू केला आहे. पावसामुळे जुन्या नाशकातील चव्हाटा भागातील जुना वाडा कोसळला तर पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 60 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने नाशिकला रेड अलर्ट दिल्याने येत्या काही दिवसांत शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रातही पावसाची संततधार असल्याने गंगापूर धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी गुरुवारी मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. शहरातील रामकुंड व गोदा घाट परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीे. संततधारेमुळे गोदेला पूर आल्याने नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व आवश्यक उपाययोजना सुरू असून आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दारणा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात 50 टक्के पाणीसाठा आहे. गुरुवारी धरणातून दुपारी 3 वाजता 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. धरणातल्या पाणी आवकानुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
वालदेवीत एकजण बुडाला
वालदेवी धरणात जालिंदर रामदास फडोळ (35) हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुडाले. त्यांचा प्रशासनाकडून शोध घेणे सुरू केले होते. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मंत्री महाजनांची पाहणी
शहरात झालेल्या पावसाने गोदेला पूर आला असून, प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटीत जाऊन पाहणी केली. यावेळी आ. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.