जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू
नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शहरास जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नऊ धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहरात दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी (दि. 25) नाशिक जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार सकाळपासूनच शहरात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली होती. शहरात दिवसभरात 14.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जून महिन्यातच जिल्ह्यातील पाणीसाठा 60 टक्क्यांंवर पोहोचला होता. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील धरण समूहात 72.76 टक्के साठा आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.
सततच्या पावसामुळे पेरण्या उशिराने झाल्या आहेत. अनेक तालुक्यांत जास्त पाऊस होत असल्याने पेरण्यांची टक्केवारी खूप कमी आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पावसामुळे रस्त्यांची चाळण
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. जुलैच्या दुसर्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने मनपाकडून रस्ते बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
आज यलो अलर्ट
नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने शनिवारी
(दि. 26) पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणांतून
विसर्ग (क्यूसेकमध्ये)
दारणा 5,198
नांदूरमध्यमेश्वर बंधारा 4,769
वालदेवी 241
आळंदी 30
भावली 588
भाम 1,376
वाकी 924
करंजगाव 100
कडवा 406