सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची तयारी जोरात

विविध व्यावसायिकांची लगबग; महिला सबलीकरणाचा उत्सव

सप्तशृंगगड : वार्ताहर
उत्तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या सप्तशृंगगडावरील सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा उत्सव व्यावसायिकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. व्यावसायिकांनी दुकानाला लागणार्‍या विविध वस्तूंची खरेदी केली आहे.
नवरात्रीचा उत्सव हा केवळ उत्सवाचा काळ नाही तर व्यवसायासाठीही हा महत्त्वाचा कालावधी आहे. सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवात लाखो भाविक हजेरी लावतात. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व कोजागरी पौर्णिमेचे दोन दिवस या कालावधीत किमान दहा लाख भाविक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. गडावर साधारणतः अडीचशे ते तीनशे व्यावसायिक विविध प्रकारचे व्यवसाय करतात. मात्र, यात्रा कालावधीत बाहेरील व्यावसायिकही येत असतात. या काळात नारळ, हार, फुले, प्रसाद, देवीचे फोटो, खेळणी, साड्या, पेढे, पादत्राणे, बांगड्या, हळद, कुंकू, चुनरी या व अशा अनेक प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. दरम्यान, या सर्व वस्तू घाऊक पद्धतीने खरेदी करण्यासाठी व खरेदी केलेला माल पॅकिंग करून मांडण्याची गडावरील व्यावसायिक तयारी करीत आहेत. यात्रोत्सव कालावधीत गडावर पेढ्यांची विक्री प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर होते.

नवरात्रोत्सवाचे महत्त्व

महिलांच्या सबलीकरणाचा उत्सव असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात, हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु, नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेचा, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. येथे वस्त्र किती किमतीचे आहे, हा प्रश्न नसतो. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते, ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात.

विविध वस्तूंच्या खरेदीसाठी वेग

प्रसादासाठी साखर, फुटाणे, रेवड्या, खडीसाखर, लाह्या, मुरमुरे, फुटाणे हे बहुतांश व्यावसायिक नाशिक येथून खरेदी करतात. मालेगाव येथून साड्या, शालू, पैठणी यांची खरेदी केली जाते. हळद, कुंकू, पंढरपूर येथून खरेदी केले जाते. नारळ आंध्र प्रदेश येथून घाऊक स्वरूपात खरेदी केले जातात. बांगड्या, शोभेचे हार, खेळणे व विविध वस्तू मुंबई येथून खरेदी करण्यात येतात. विविध रंगांच्या चुनरी गुजरात राज्यातून खरेदी केल्या जातात. फुलांचे हार स्थानिक पातळीवर खरेदी केले जातात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *