कांद्याचा कारभार आता शेतकर्‍यांच्या हातात sinnar management of onion

जायगावात उभे राहणार जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’

सिन्नर : प्रतिनिधी
कांदा पिकवणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिलासादायक आणि आशेचा किरण ठरणारी मोठी घोषणा सोमवारी (दि. 15) सिन्नर येथे झाली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पत्रकार परिषदेत जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात उभारले जाणार असल्याची माहिती दिली.

हे राष्ट्रीय कांदा भवन सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला दोन एकर जागेवर उभारले जाणार आहे. पुढील काळात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा निधी शेतकर्‍यांच्या देणगीतून उभारला जाणार आहे. राष्ट्रीय कांदा भवनात राहण्याची व जेवणाची सोय, बैठक व परिषद कक्ष, इंटरनेट, संगणक तसेच कांदा तपासणी लॅब उभारली जाणार आहे.
“आजवर कांदा शेती म्हणजे तोटा, कर्ज आणि चिंता अशीच ओळख झाली होती. मात्र, राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेती ही भरवशाची आणि शेतकर्‍यांच्या भवितव्यास आधार देणारी ठरेल,” असे भारत दिघोळे यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या विरोधात राज्य किंवा केंद्र सरकारने धोरणे राबवली तर संवादाबरोबरच गरज पडल्यास संघर्षही केला जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी सिन्नर युवक तालुकाध्यक्ष अरुण चव्हाण यांच्यासह सोमनाथ गिते, गणेश सांगळे, कैलास आव्हाड, संतोष दिघोळे, भाऊसाहेब केदार, सतीश दिघोळे, नितीन गिते, गणेश दिघोळे, सिद्धार्थ गिते, मारुती भांगरे, उत्तम आव्हाड, रामभाऊ भांगरे आदी उपस्थित होते.

बियाण्यापासून बाजारापर्यंत एकाच छताखाली

या भवनातून कांदा बियाणे संशोधन, दर्जेदार रोपे, खत-औषधांचे योग्य नियोजन, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सामूहिक खरेदी आणि पिकावर सतत लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे.

बाजार समित्यांतील लूट थांबवणार

राज्य व देशातील बाजार समित्यांमधील कांदा विक्री व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी राष्ट्रीय कांदा भवन लक्ष ठेवणार असून कोणत्याही शेतकर्‍याची फसवणूक होणार नाही, असेही सांगण्यात आले.

कांद्याचे सगळे निर्णय शेतकर्‍यांच्या मुख्य ठिकाणावरून

भारत हा कांदा उत्पादनात पुढे असला, तरी आयात-निर्यात, निर्यातबंदी, नाफेड-एनसीसीएफचा साठा आणि दरनियंत्रणाचे निर्णय आजवर शेतकर्‍यांना विचारात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन सुरू झाल्यानंतर हे सगळे निर्णय शेतकर्‍यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

थेट शेतकरी- ग्राहक विक्री

दलालांची साखळी कमी करून शेतकरी राष्ट्रीय कांदा भवन देशी व विदेशी ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था उभी केली जाणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना चांगला दर मिळणार असून, ग्राहकांनाही माफक दरात कांदा उपलब्ध होणार आहे.

sinnar 
management of onion

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *