मागील वर्षी वर्षी 5 ऑगस्ट 2025 ला बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. दंगली झाल्या, प्रचंड प्रमाणात जाळपोळ झाली. शेख हसीना यांनाही देश सोडून भारतात पलायन करावे लागले. या दंगलीमध्ये स्थानिक हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाऊ लागले, हिंदूंना घरात घुसून मारहाण होऊ लागली, त्यांची घरे, दुकाने लुटून ती जाळण्यात येऊ लागली, त्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या, त्यांना त्यांच्याच घरातून त्यांना हाकलले जाऊ लागले.
हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होऊ लागले, देवतांच्या मूर्तींची तोडफोड होऊ लागली, हिंदू स्त्रियांवर, बालकांवर अत्याचार होऊ लागले. ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेले हे हिंदूविरोधी लोण आजही कायम आहे. बांगलादेशमध्ये आजमितीला जवळपास अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा सर्वांत मोठा फटका तेथील स्थानिक हिंदूंना बसत आहे. दीपू चंद्रदास नावाच्या हिंदू युवकाची बांगलादेशातील धर्मांधांनी केलेल्या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिदिन नवनवीन व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत, ज्यामध्ये हिंदूंना त्यांच्या घरांतून, दुकानांतून, नोकरीच्या ठिकाणाहून वेचून बाहेर काढले जात आहे आणि शेकडोंच्या संख्येने धर्मांध त्यांवर तुटून पडत आहेत. ज्यांचे व्हिडीओ काढण्यात आलेत त्या घटना उजेडात येत आहेत प्रत्यक्षात हा नरसंहार किती मोठ्या प्रमाणात चालू आहे, याची कल्पनाही करता येत नाही.
हिंदूंना मॉब लिचिंग करून ठार केले जात आहे. हिंदू मुलींवर आणि महिलांवर बलात्कार केले जात आहेत. हिंदूंची मंदिरे फोडली जात आहेत. मागील दीड वर्षे चालू असलेल्या या अराजकावर तेथील सरकारचे जराही नियंत्रण नाही किंबहुना सरकारकडून गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे.
सन 1947 साली पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये एक तृतीयांश हिंदू होते. 2022 मध्ये जेव्हा देशात जनगणना झाली तेव्हा तेथे 7 टक्के हिंदू शिल्लक राहिल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. फाळणीनंतर तेथील हिंदूंची संख्या कमी होत गेली तर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. फाळणीपासूनच स्थानिक अल्पसंख्य हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, स्थानिकांच्या छळाला कंटाळून दरवर्षी लाखो हिंदू देशातून पलायन करतात. हे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांगलादेशातील हिंदूंना दिली जाणारी अन्याय्य वागणूक हा जुना विषय असला, तरी गेल्या दीड वर्षात तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, हे असेच चालत राहिले तर पुढील काही महिन्यांतच बांगलादेशात नावालाही हिंदू शिल्लक राहणार नाही. याउपरांत बांगलादेशातील गरिबीला कंटाळून बांगलादेशी मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत आहेत.
आजमितीला ही संख्या दहा कोटींहून अधिक झाली आहे. भारतातील विकसनशील शहरी भागात बांगलादेशी नागरिकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. येथील स्थानिक झोपडपट्टीदादा पैशांच्या मोबदल्यात या बांगलादेशी घुसखोरांच्या निवार्याची, नोकरी -व्यवसायाची आणि कागदपत्रांची व्यवस्था करून देतात.
आजमितीला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि अनधिकृत कामांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचे उघड होत आहे. घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलण्याचा कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, त्याची कठोरपणे अंमलबजावणीच केली जात नाही. एकीकडे बांगलादेशातील हिंदू नामशेष होऊ लागला आहे, तर दुसरीकडे भारतात आलेले बांगलादेशी घुसखोर भारताची अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू लागले आहेत.
भारतात अवैधपणे राहणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलून देण्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवण्यात यावी तसेच भारताच्या शेजारील राष्ट्रांत अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भारताने आंतराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, दर वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा त्या घटनेचा तीव्र निषेध करण्याव्यतिरिक्त सरकारकडून अन्य काही पावले उचलली जात नसल्याचे लक्षात येते. आज जसे बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे तसे ज्यू लोकांना करण्याची हिंमत कोणत्याही देशाची नाही. ज्यू लोकांवर जगभरात कोठेही हल्ले झाले तर इस्त्रायल पेटून उठतो. ज्यू लोकांना संरक्षण देण्यासाठी आक्रमक होतो. भारत अशा प्रकारची भूमिका केव्हा घेणार आहे?