वडांगळीत आजपासून सतीमाता-सामतदादा यात्रोत्सव

तीन दिवसांची यात्रा; लाखो बंजारा भाविक येणार

सिन्नर : प्रतिनिधी
बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यांचा वार्षिक यात्रोत्सव आज शनिवार(दि. 31)पासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रेसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, भाविकांची वडांगळी येथे ये-जा वाढू लागली आहे.
माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी लाखो बंजारा भाविक वडांगळी येथे येऊन सतीमाता व सामतदादाचे दर्शन घेतात व नवस फेडतात. भाविकांना पाणी, आरोग्य व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेचा मुख्य दिवस माघ पौर्णिमा असून, रविवारी पहाटे 5 वाजून 52 मिनिटांनी यात्रेला प्रारंभ होणार आहे. सतीमाता-सामतदादा ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. 1) पहाटे साडेपाच वाजता अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते सतीमातेचा, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत जाधव यांच्या हस्ते सामतदादाचा अभिषेक होणार आहे. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस यात्रोत्सव चालणार असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने अनेक भाविक आधीच मुक्कामासाठी वडांगळी येथे दाखल झाले आहेत. रविवारी सायंकाळी मुखवटा व काठी मिरवणूक काढण्यात येणार असून, शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
यात्रेनिमित्त मंदिराची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात राहणार आहे. सोमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वडांगळी उपकेंद्रातील कर्मचारी भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. यात्राकाळात गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा व कायदा-सुव्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला आहे. सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. शासनाकडून पाण्याचे टँकर उपलब्ध होण्यासाठी तहसीलदारांनी विशेष प्रयत्न केल्याचे सरपंच नानासाहेब खुळे यांनी सांगितले.

Satimata-Samatdada pilgrimage festival begins in Vadangi today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *