प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!’ असे मंगेश पाडगावकरांनी कवितेतून सांगितले असले, तरी हल्लीच्या प्रेमातसुद्धा बरेच प्रकार तयार झाले आहेत. सकाम आणि निष्काम प्रेम हे त्यातील मुख्य प्रकार. आपल्यावर प्रेम आहे म्हणणारी व्यक्ती आपल्यावर निष्काम प्रेम करते की त्यामागे तिचा काही हेतू दडला आहे, हे ओळखणे आजच्या काळात अत्यावश्यक बनले आहे.
प्रेमातील फसवणुकीची प्रकरणेही हल्ली वाढली आहेत. यात बर्याचदा बळी जातो तो मुलीचा. प्रेमात फसवणूक झाल्याने दरवर्षी कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तर कितीतरी जणी निराश होऊन मृत्यूला कवटाळतात. मुलींचे मनच मुळात भावनाशील असल्याने प्रेमात अशाप्रकारे वर्गवारी करणे प्रत्येकीला जमतेच असे नाही. मुलींच्या याच कमजोरीचा गैरफायदा घेणारे, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणारे, तिच्या भावनांशी खेळणारे राक्षसी प्रवृत्तीची माणसे आज चहुबाजूंनी पसरलेली आहेत. त्यामुळे आता मुलींना प्रेमात आंधळे होणे परवडणारे नाही.
काही जण म्हणतील प्रेम केले जात नाही, तर ते आपसूकच होते. असे असेल तर दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी या सात दिवसांत तरुणवर्गामध्ये उत्साहाने साजरा केला जाणारा ‘व्हॅलेंटाइन वीक’चा ऊहापोह कशासाठी? हा सप्ताह नेमका प्रेमाचा असतो की स्वैराचाराचा? ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या स्वागतासाठी भेटवस्तूंची दुकाने मागील तीन-चार दिवसांपासून सजली आहेत. वृत्तवाहिन्यांतून सौंदर्यतज्ज्ञांना निमंत्रित करून ‘व्हॅलेंटाइन वीक’साठी मुलींनी कशा प्रकारे तयारी करावी याबाबतच्या ‘टिप्स’ दिल्या जात आहेत. ‘कॉलेज कॅम्पस’मध्येसुद्धा सध्या याच विषयाची चर्चा रंगलेली दिसून येते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली. मात्र, त्यांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीच्या जोखडातून आपण अद्याप मुक्त झालो नसल्याचा प्रत्यय दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन वीक’ सुरू झाला की येऊ लागतो. ठव्हॅलेंटाइन डे’ची ‘क्रेझ’ जेवढी भारतात पाहायला मिळते तेवढी अन्य पाश्चिमात्य देशांमध्ये खचितच असावी. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत विविध ‘डेज्’ भारतासारख्या संस्कृतीप्रिय राष्ट्रात तरुण- तरुणींकडून उत्साहाने साजरे केले जातात. शहरातील ही ‘क्रेझ’ हळूहळू ग्रामीण भागातही पसरू लागली आहे. मातृभाषेला डावलून इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुलांना घालण्याकडे पालकांचा वाढत चाललेला कल हेच यामागील प्रमुख कारण असावे.
या दिवसांत अनेक शाळा व महाविद्यालयांच्या आवारात शैक्षणिक वातावरण बिघडवणार्या घडामोडी घडत असतात. परीक्षेच्या तयारीच्या दिवसांत काही चंगळवादी युवक-युवतींची भलतीच तयारी सुरू असते. ज्याचा परिणाम शाळा, महाविद्यालयांतील अन्य विद्यार्थीवर्गावर होत असतो. अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालय प्रशासनही या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, याचे खरेतर नवल वाटते. या दिवसांत ‘डेज्’च्या निमित्ताने पालकांच्या पैशांची तरुणांकडून मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जाते. या सात दिवसांत गर्भनिरोधक साधनांचा खपही वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. असल्या विदेशी भोगवादी दिवसांच्या मौजमजेमध्ये काडीमात्र रुची नसणार्या अनेक मुलींना या ‘डेज्’चा कमालीचा मनस्ताप होतो. ‘रोझ डे’, ‘प्रपोज डे’, ‘प्रॉमिस डे’, ‘किस डे’, ‘हग डे’, ‘चॉकलेट डे’ आणि ‘व्हॅलेंटाइन डे’ यांसारख्या डेज्च्या निमित्ताने किशोरवयीन मुलींवर घातला जाणारा दबाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करतो. कितीतरी मुली या दिवसांत वासनांधांच्या खोट्या प्रेमाला भुलतात आणि आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतात. लव्ह जिहादची प्रकरणे देशाच्या कानाकोपर्यांतून वाढू लागली आहेत. अशांसाठी हे डेज् म्हणजे ईप्सित साध्य करण्यासाठी मिळालेली पर्वणीच असते. प्रेमाला भारतीय संस्कृतीने नेहमीच पवित्र आणि उच्च स्थान दिले आहे. मात्र, प्रेमाच्या नावाखाली घातला जाणारा बाजार आणि चालणारा स्वैराचार आपल्या संस्कृतीला नक्कीच शोभणारा नाही. भारतीय संस्कृतीवर आघात करणारा आणि युवावर्गाचे नैतिक अधःपतन करणारा ‘व्हॅलेंटाइन वीक’ आपल्या देशात हवा तरी कशाला?
Valentine’s Week: A week of moral degradation for the youth