डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय प्रवासातील एक मजबूत आधार होत्या. रमाबाई आंबेडकर या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्या डॉ. बाबासाहेबांची एका बाळाप्रमाणे काळजी घेत असे. अशा महान थोर माता ज्यांनी आपल्या सर्व इच्छा- आकांक्षा, भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली. रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 ला वंणद या गावी एका गरीब कुटुंबात झाला. रमाबाई लहान असताना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचेसुद्धा निधन झाले. आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. रमाबाई यांचे लग्न त्या काळी बालविवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 वर्षे तर रमाईंचे वय 9 वर्षे होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर बाबासाहेब इ.स. 1923 मध्ये आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागले. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी परदेशात असताना रमाबाईंनी कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. गरिबीमुळे त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले, पण त्यांनी कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही. डॉ. बाबासाहेब दिवसरात्र समाजाच्या उद्धारासाठी कार्यरत असताना, त्यांचे आरोग्य आणि कुटुंबाची जबाबदारी रमाबाईंनी समर्थपणे पार पाडली. त्यांना संसारात अनेक दु:खं सहन करावी लागली. रमाबाई आंबेडकर समाजातील असमानतेविरुद्ध लढण्यासाठी नेहमी प्रेरित राहिल्या. त्यांनी शिक्षणाचा महत्त्वाचा भाग ओळखला आणि अनेक महिलांना शिक्षित करण्यासाठी कार्य केले. त्यागमूर्ती रमाबाई यांचा त्याग आणि समर्पण नेहमी लक्षात ठेवला जाऊ शकतो, कारण त्यांनी त्यांच्या पतीच्या कार्यात त्यांना पूर्ण समर्थन दिले आणि समाजातील असमानता विरुद्धच्या लढ्यात सक्रिय
सहभाग घेतला.
महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा पत्नी असू शकते. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे. युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्य्राच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.
जगात जे महान थोर पुरुष होऊन गेले, त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा स्त्रीचा/धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा आहे. याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाच्या मागे त्यांच्या आईचा राजमाता जिजाबाई यांचा वाटा होता. जोतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्यदक्ष त्यागमूर्ती विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. रमाबाईंच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाजासाठी झटू शकले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. त्यांच्यावर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर नावाने अनेक ग्रंथ, गीते आणि नाटके तयार झाली आहेत. रमाबाई या केवळ एक पत्नी नव्हत्या तर त्या डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाच्या वाटेवरील एक अनमोल शक्ती होत्या. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहोत. आज त्यांची जयंती त्यानिमित्त विनम्र
अभिवादन!
Tyagamurthy Mata Ramabai Ambedkar…