शेंगदाणे, साबुदाणा, भगरीच्या दरात वाढ
नाशिक ः प्रतिनिधी
येत्या रविवारी (दि.15) महाशिवरात्र साजरी होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त उपवास केला जातो. उपवासासाठी लागणार्या पदार्थांना मागणी वाढली असून, दरही वाढले आहेत. शेंगदाणे, साबुदाणा आणि भगर, उपवासाची पिठेही महागली आहेत. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीचा फराळ महागला आहे. शेंगदाणे 180 ते 220 रुपये किलो, साबुदाणा 70 ते 75 रुपये किलो आणि भगर 180 ते 190 रुपये किलो महागली आहे.
महाशिवरात्री देशभरात साजरी केली जाते. अनेकजण महाशिवरात्रीनिमित्त उपवास करतात. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा वर्षातील अत्यंत पवित्र दिवस असून, या दिवशी घरोघरी उपवासासाठी खिचडी, थालीपीठ, साबुदाणा वडा आणि इतर फराळी पदार्थ केले जातात. महाशिवरात्रीमुळे अनेक मंदिरांमध्ये, सार्वजनीक ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद वाटप केले जाते. त्यामुळे दरवाढीचा फटका सामाजिक संस्था आणि भाविकांना बसणार आहे.
उपवासासाठी लागणार्या रताळी, कवठ यांची आवक वाढली असली तरी दर चढेच आहेत. रताळी 80 रुपये किलो असून, चांगल्या प्रतीचे कवठ 20 ते 40 रुपये दराने विक्री होत आहे.
नोकरदार वर्गाकडून रेडिमेड फराळी पदार्थांच्या ऑर्डरला प्राधान्य देण्यात येत आहे. उपवासासाठी तयार पदार्थांनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे. बटाटा चिवडा, केळी, बटाटा वेफर्स, राजगिरा, शेंगदाणा लाडू, चिक्की, साबुदाणा चिवडा आदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
त्याचबरोबर दूध, दही, ताक, तयार खिचडी, बटाटा जिलेबी, बासुंदी, श्रीखंड, खवा यांची ऑर्डर देण्याचे नियोजन सुरू असल्याचे चित्र आहे.उपवासाच्या पार्श्वभूमीवर केळी,
सफरचंद, चिकू, पपई, रामफळ, पेरू,
ड्रॅगनफ्रूट, शहाळे, डाळिंब आदींनाही मागणी वाढली आहे.