क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

आज 17 फेब्रुवारी, स्वातंत्र्यसंग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांंचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात -अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले. त्यात वस्ताद लहुजी साळवे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वस्ताद लहुजी साळवे यांनी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे महान कार्य केले, त्या कार्याची नोंद भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सुवर्ण अक्षरांनी घ्यायला हवी होती, मात्र दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दखल इतिहासकारांनी घेतली नाही. म्हणूनच त्यांच्या कार्याविषयी देशातील खूपच कमी लोकांना माहिती आहे.
वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे ( राऊत ) तर आईचे नाव विठाबाई असे होते. लहुजी साळवे यांचा जन्म शूरवीरांच्या घरात झाला. त्यांचे खापर पणजोबांवर शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती.
त्यांचे वडील राघोजी साळवे हे दुसर्‍या बाजीरावांच्या काळात शिकारखाना व शस्त्रगाराचे प्रमुख होते. लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्याने लहुजींनीदेखील शूर बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी लहुजींना लहानपणापासूनच शस्त्रांची आणि युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी घोडेस्वारी करणे, दांडपट्टा फिरवणे, भालाफेक करणे, बंदूक चालवणे, तोफगोळे फेकणे, गनिमीकावा करणे, शत्रूंची गुप्त माहिती गोळा करणे या युद्धकलांत पारंगत झाले. 5 नोव्हेंबर 1897 रोजी पेशव्यांचे इंग्रजांसोबत घनघोर युद्ध सुरू झाले. या युद्धात राघोजींसोबत तरुण लहुजीही सहभागी झाले.
या युद्धात राघोजी लहुजी या बापलेकांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र या युद्धात राघोजींना वीरमरण आले. या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. वडिलांना वीरगती प्राप्त झाल्यावर लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी राघोजी साळवे शहीद झाले त्या ठिकाणीच लहुजींनी 17 नोव्हेंबर 1817 ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी, अशी शपथ घेतली.
इंग्रजांशी लढायचे असेल तर त्यासाठी जहालच व्हावे लागेल हे ओळखून त्यांनी तरुणांना जागृत केले. लहुजी साळवे यांनी पुण्यातील मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यासाठी पुण्यातील रास्ता पेठेत देशातील पहिले तालीम युद्ध कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्व समाजातील तरुण सहभागी झाले. 1839 मध्ये इंग्रजांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून हटवले. छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत केल्याने तरुणांमध्ये इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. याचा वचपा काढण्यासाठी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी महाराष्ट्रात तर उत्तरेत रंगोबापू यांनी लहुजींच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. 12 जून 1857 ही बंडाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, बंडाची कुणकुण इंग्रजांना लागली व त्यांनी लहुजींसह अनेक क्रांतिकारकांना पकडले, मात्र त्यामुळे इतर क्रांतिकारक चिडले व त्यांनी पुरंदरच्या मामलेदारांना ठार मारले. मामलेदारांच्या हत्येला जबाबदार ठरवून इंग्रजांनी कनय्या मांग व धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी दिले हे दोघेही लहुजींचे
शिष्य होते.
याच हत्येला जबाबदार ठरवून आणखी काही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतिकारकांना लहुजी साळवे यांनीच प्रशिक्षण दिले, असा संशय असल्याने इंग्रजांनी लहुजी साळवे यांना अटक करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लावला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लहुजी साळवे हे वेषांतर करून भ्रमंती करू लागले. या काळात त्यांनी सातारा, पन्हाळा या ठिकाणच्या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्र उभारली. या प्रशिक्षण केंद्रांतून त्यांनी अनेक क्रांतिकारक
तयार केले. 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्यातील संगमपूरच्या परिसरात एका झोपडीवजा घरात लहुजींची प्राणज्योत मालवली आणि एका महान क्रांतिपर्वाचा शेवट झाला.
भारतमातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी वस्ताद लहुजी साळवे शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि आपल्या सारखेच हजारो जहाल क्रांतिकारक निर्माण केले. म्हणूनच त्यांना क्रांतिकारकांचे गुरू असे म्हणतात. आज त्यांचा स्मृतिदिन, मात्र आजही त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला नाही हे आपले दुर्दैव. अर्थात, याला आपले इतिहासकारदेखील तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवले नाही. वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Vastad Lahuji Salve, the Guru of Revolutionaries

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *