अवकाळीची शक्यता; शेतकर्‍यांत धास्ती

निफाड : विशेष प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू व हरभरा ही पिके काढणीच्या टप्प्यावर आल्याने शेतकरी शक्य तितक्या लवकर पीक काढणी करून धान्य सुरक्षितपणे घरी आणण्याची धडपड करताना दिसत आहेत.
यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निफाड तालुक्यात रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. या पिकांना योग्य वातावरण मिळाल्याने उत्पादनही चांगले येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तालुक्यात गहू काढणीचा हंगाम जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी शेतांमध्ये हार्वेस्टरच्या सहाय्याने पीक काढणी केली जात आहे.शेती व्यवसायात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी अनेक शेतीकामांसाठी अजूनही शेतमजुरांची गरज भासते. मात्र, सध्या तालुक्यातील बहुतांश शेतमजूर द्राक्ष व कांदा काढणीच्या कामात गुंतलेले असल्यामुळे ग्रामीण भागात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काढणीसाठी हार्वेस्टरचा आधार घ्यावा लागत आहे. यंदा तालुक्यात रब्बीची पेरणी काहीशी उशिरा झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली होती. त्यामुळे सध्या अनेक शेतांमध्ये गव्हाचे पीक पूर्णपणे तयार झाले असून, त्याची काढणी सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी पीक लवकरात लवकर काढून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टर यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, काढणीसाठी शेतकर्‍यांना प्रतिएकर दोन ते अडीच हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. तरीदेखील संभाव्य पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी हा खर्च करूनही काढणी लवकर पूर्ण करण्यावर भर देत आहेत. यंदा गव्हाच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे एका एकरातून 15 ते 16 क्विंटलपर्यंत गव्हाचे उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, काढणीच्या काळात अवकाळी पाऊस झाला तर शेतात उभ्या किंवा काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्या गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टरची मोठी मागणी आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी काढणी तातडीने पूर्ण करण्यावर भर देत आहेत. एका एकरातून साधारण 15 ते 16 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. – वैभव संगमनेरे, हार्वेस्टर मालक, नैताळे

Possibility of unseasonal rain; Farmers fear

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *