दर बारा वर्षांनी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याला जगभरातील भाविक पर्वणी असलेल्या पावन दिनी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. यावेळच्या सिंहस्थाचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. तब्बल 22 हजार कोटींचा निधी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला आहे. यात पहिल्या टप्प्यातील पाच हजार 140 कोटी आणि दुसर्या टप्प्यातील 17 हजार 41 कोटींच्या कामांचा यात समावेश आहे. दरम्यान, या निधीतून योग्य व पारदर्शक कामे होण्याकरिता शासनाने सिंहस्थ प्राधिकरण स्थापित केले आहे. नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसिंचन विभाग, पोलीस प्रशासन प्राधिकरणाच्या अख्यारितच आहेत. मुंबईत नुकतीच सिंहस्थ शिखर समितीची बैठक झाली असता, त्यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी तब्बल 22 हजार 181 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्यता दिली आहे. या निधीमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचाचेहरा बदलणार आहे. त्यामुळे नाशिककरांना सिंहस्थाबरोबरच विकासाच्या पर्वणीचा लाभ खर्या अर्थाने मिळणार आहे.
धार्मिक व ऐतिहासिकद़ृष्ट्या नाशिकचा जगभरात नावलौकिक आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या सहवासाने नाशिकला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असलेला कुंभमेळा नाशकातही होत असल्याने नाशिकमध्ये दहा वर्षांनी विकासकामांसाठी निधी येतोच. यंदा केंद्र व राज्य शासनाने उदार होत 22 हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली. महापालिकेने शहरात 29 रस्त्यांची कामे हाती घेतल्याने नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय. पण आजचा त्रास उद्याची सोय यानुसार नाशिकमध्ये चित्र दिसणार आहे. विशेषत: शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे होत आहेत. वर्षभरात नाशिककरांना चांगले दर्जात्मक रस्ते मिळणार आहेत. या रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर सिंहस्थ प्राधिकरणाचे लक्ष असणार आहे. त्यामुळे यात संबंधिताना पारदर्शकता जपावी लागणार आहे. सिंहस्थात नाशिक महानगरपालिकेवर मोठी जबाबदारी असून, रस्त्यांप्रमाणेच शहरातील पाणीपुरवठा वरच्या क्रमांंकावर आहे. भाविकांना साधुग्राममध्ये 24 तास पाणी मिळावे याकरिता थेट मुकणे पाणी योजनेतून ऊर्ध्व वाहिनीद्वारे साधुग्राममध्ये पाणी आणले जाणार आहे. सिंहस्थामुळे मुकणे पाणीपुरवठा योजना मार्गी लागत आहे. याकरिता दोनशे कोटींचा खर्च या प्रकल्पावर होत आहे. ग्रीन बॉण्डची रक्कम याकामी आली आहे. याशिवाय गोदामाईचा प्रदूषणाची समस्या सतत धगधगती राहिली आहे.
मात्र, आता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातून वाहणारे गोदावरीचे पात्र प्रदूषणमुक्त होणार आहे. स्वच्छ गोदावरीचा प्रवाह पाहण्याकरिता पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचे डोळे आसुसले आहेत. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठीच एसटीपी प्रकल्पावर सतराशे कोटींचा खर्च होत आहे. नदीला येऊन मिळणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाईल. साधुग्राममधील शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा रोख मोबदला लवकरच दिला जाणार आहे. सिंहस्थाच्या द़ृष्टीने विकासकामांंत येणारे अडथळे दूर केले जात आहेत. 50 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सिंहस्थात स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालये दर्जेदार असावीत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून होणार आहेत.
द्वारका ते नाशिकरोड दरम्यान होत असलेला आठ पदरी महामार्ग शहराच्या द़ृष्टीने मास्टरस्ट्रोक ठरणार आहे. गेल्या कित्येक वषार्ंपासून या रस्त्यासाठी मागणी केली जात होती. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या महामार्गाच्या कामाला सुरवात होत आहे. सोबतच अंडरपासचेही काम होत असल्याने एकप्रकारे द्वारकेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. दरम्यान, सिंहस्थ कामात कोणी अडथळे आणत असेल तर त्यांच्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे शासन सिंहस्थाबाबत किती सजग व खबरदारी घेत आहे, हे यावरून लक्षात येते. सिंहस्थासाठी भूसंपादन प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. अद्याप तपोवनातील शेतकर्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. बाह्य रिंगरोडच्या भूसंपादनाचेही काम रखडले आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एकंदरीत विचार केल्यास सिंहस्थ हा नाशिकच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. याचे सकारात्मक चित्र लवकरच बघायला मिळेल, हे मात्र निश्चित. सध्या रस्तेकामामुळे नाशिककरांना त्रास होत असला, तरी सिंहस्थामुळे शहर विकासाची कामे होत असताना त्याचा लाभ नाशिकच्याच नागरिकांना होणार आहे.
The blessing of development from the throne