जीवनाचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात

मानवाच्या अंतःकरणातील भावविश्वात सुख आणि दुःख या दोन गोष्टींचा मिलाप असतो. कधी दुःख, तर कधी सुख जीवनात असते. डोंगर आणि दरी जसे असते तसे दुःख आणि सुख असते. कधीकधी जीवनात दुःखाचा डोंगर येतो तर कधी सुखाच्या क्षणाची वाट पाहत बसावी लागते. सुख म्हणजे काय तर जीवनातील आनंद आणि तो जीवनातील आनंद कुठे मिळत असेल तर तो सर्वांत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात मिळतो.
तुम्ही कितीही दुःखी असाल, जीवनात कुठलाही दुःखद प्रसंग असेल, पण त्याही प्रसंगात तुम्ही जर निसर्गातील असलेल्या धरणाच्या काठी कातरवेळी जाऊन बसले तर तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही, भावनांचे फुल उमलल्याशिवाय थांबणार नाही, कातरवेळी सूर्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहताना तुम्हालाही तुमची दुःखाची सावली कमी झाल्यासारखी वाटेल, मनाला स्पर्श करणारी अलगद येणारी वार्‍याची एखादी झुळूक तुमच्यात हर्ष निर्माण करेल,
धरणाशेजारी असलेल्या झाडावर चाललेला पक्षांचा आवाज शांत मनाने ऐकला तर पक्ष्यांचे आपापसांतले बोलणे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही, निसर्गातील प्रत्येक घडामोडीचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनातील दुःख विरून जाईल व शब्दांचे शिल्प केले तर त्यातून एखादी कविता तयार होईल ज्या कवितेने निसर्गाचे सुंदर वर्णन करता येईल.
अनेकदा माणसं दुःखी होतात. कधीकधी तर टोकाचा निर्णय घेतात. तो म्हणजे आत्महत्या. परमेश्वराने दिलेला हा देह संपवून टाकतात. पण जेव्हा अशी कल्पना जरी कोणाच्या मनात डोकावली तर त्या क्षणी घराचा त्याग करून निसर्गाच्या सानिध्यात कुठेही जा नदी किनारी, डोंगरावर, बागेत कुठेही जाऊन बसा, मनातील भावनांचा कल्लोळ आपोआप शांत होईल. तुमचे मन त्यात नक्की रमेल वडाच्या गार सावलीत, पिंपळाच्या पारावर, झोक्यावर, खळखळणार्‍या नदीच्या किनार्‍यावर, उगवणार्‍या सूर्याच्या तिरमित किंवा मावळणार्‍या सूर्याच्या कोमल प्रकाशात कुठेही जा तुम्हाला आनंदच मिळेल. दुःख विरळ होईल. तुमच्या जीवनात एक नवा किरण उगवेल. जो तुमच्या जीवनातील अंधकार मिटवून टाकेल. एक आनंद तुम्हाला मिळेल. त्या आनंदाची किंमत पैशातदेखील मोजता येणार नाही.
निसर्ग हेच एकमेव ठिकाण आहे तिथे सर्व
दुःखांचे निराकरण होते. सिमेंटच्या जंगलात झालेले दुःख विसरण्याचे ठिकाणदेखील निसर्ग आहे. निसर्ग आम्हाला काय देत नाही हवा, पाणी, अन्न सर्वकाही देतो. सप्तरंगाचे निसर्गातील इंद्रधनुष्य पाहिले तर आपल्याही जीवनात आनंदाचे रंग भरले जातात.
फुलावर बसलेल्या मधमाश्या, आकाशात मनसोक्त उडणारे पक्षी, सूर्य मावळताना घराकडे येणारे गाई, गुरे, वासरे सगळं काही निसर्गाचे दृश्य पाहताना मानवाला झालेले कुठलेही दुःख हे नक्कीच विसरले जाईल आणि मग जीवनात आनंदाची ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचा आनंद फक्त आणि फक्त निसर्गातच मिळतो. जीवन सुखी करण्याचा, जगण्याचा खरा मार्ग असेल तर तो निसर्गच.

The joy of life in the presence of nature

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *