मंत्रालयात ‘मार्चएंड’चा धमाका; चार दिवसांत 951 जीआरचा ऐतिहासिक विक्रम

सुट्ट्यांमध्येही थांबले नाही काम; दिव्यांग कल्याण, पर्यटन, शालेय शिक्षणात अध्यादेशांचा पाऊस

मुंबई : विशेष प्रतिनिधी
कॅलेंडरवर सुट्टी असो किंवा नसो, मार्च 2026 च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयातील दिवे मात्र बंद झाले नाहीत. आर्थिक वर्ष 2025-26 च्या अखेरच्या चार दिवसांत, म्हणजे 28 ते 31 मार्चदरम्यान महाराष्ट्र शासनाने तब्बल 951 शासननिर्णय (जीआर) जारी केले. हा आकडा सामान्य नाही. हा एक विक्रम आहे. प्रशासकीय इतिहासात या काळाची नोंद ’महाजीआर धमाका’ म्हणून होणार, हे निश्चित!
विशेष म्हणजे, या चार दिवसांपैकी शनिवार, रविवार आणि मंगळवार (महावीर जयंती) हे तीन दिवस अधिकृत सुट्टीचे होते. सोमवार हा एकमेव कामकाजाचा दिवस होता. पण मार्चएंड असल्याने या चारही दिवशी सर्व कर्मचारी मंत्रालयात उपस्थित होते. मंत्री, अधिकारी, कर्मचारी आणि आमदारांचे स्वीय सहायक सगळ्यांनीच मंत्रालयात ’ठिय्या’ मांडला होता. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आपापल्या विभागाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी एकच धडपड सुरू होती.
मार्चच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी (31 मार्च), सुटी असूनही, एकाच दिवशी तब्बल 267 जीआर निर्गमित करण्यात आले. महावीर जयंतीच्या सुट्टीत इतक्या मोठ्या संख्येने शासननिर्णय जारी होणे, हे प्रशासकीय तत्परतेचे एक अभूतपूर्व उदाहरण ठरले.
जीआरचा विभागनिहाय लेखाजोखा
या चार दिवसांत कोणत्या विभागाने किती जीआर काढले, यावर एक नजर टाकली असता चित्र अधिक स्पष्ट होते. सर्वाधिक आघाडी घेतली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने! या विभागाने 122 जीआर जारी केले. त्यापाठोपाठ दिव्यांग कल्याण विभागाचे 100 जीआर ठळकपणे उठून दिसतात. शालेय शिक्षण विभागाने 85, मृद व जलसंधारण विभागाने 65, महसूल व वन विभागाने 64 आणि उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 61 जीआर काढले. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने 35, सामान्य प्रशासन विभागाने 35 आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने 35 जीआर निर्गमित केले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे 53, गृह विभागाचे 41, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 41, पर्यावरण विभागाचे 39, अल्पसंख्याक विकासचे 14 असे आकडे नोंदविले गेले.
काही विभाग मात्र
चर्चेत आले ते त्यांनी शून्य जीआर काढल्याने. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जलसंपदा विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि संसदीय कार्य विभाग या चार विभागांनी या काळात एकही शासननिर्णय जारी केला नाही.

नव्या आर्थिक वर्षाची नांदी
31 मार्चला आर्थिक वर्ष संपले आणि 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली. 2026-27 च्या नव्या वर्षात महाराष्ट्र शासन ताज्या अर्थसंकल्पीय तरतुदींसह कामकाजाला सुरुवात करेल. पण या 951 जीआरच्या ’महाधमाक्या’ने एक प्रश्न मात्र अनुत्तरित ठेवला आहे – प्रशासकीय कार्यक्षमता वर्षभर असती, तर या ’शेवटच्या क्षणाच्या धावपळी’ची खरोखरच गरज होती का?

’मार्चएंड’चे गणित- का होतो हा घाईघाईचा खेळ?
भारतीय आर्थिक कॅलेंडरमध्ये 31 मार्च ही एक महत्त्वाची ’डेडलाइन’ आहे. प्रत्येक विभागाला त्याच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीतील निधी या तारखेपूर्वी खर्च करणे किंवा निधी वितरणाचे आदेश देणे आवश्यक असते. न वापरलेला निधी लॅप्स होण्याची शक्यता असल्याने, प्रत्येक विभाग शेवटच्या दिवसांत सर्व प्रलंबित प्रस्ताव जीआरच्या रूपात अंतिम करतो. थोडक्यात सांगायचे तर, वर्षभर जे काम रेंगाळत राहते ते या ’मार्चएंड’च्या धुमश्चक्रीत मार्गी लावण्याचा प्रयत्न होतो.

विरोधकांचा सवाल- घाई की प्रामाणिकपणा?
या जीआर धमाक्याचे कौतुक करणार्‍यांचाही एक वर्ग आहे आणि प्रश्न विचारणार्‍यांचाही. विरोधकांकडून नेहमीच हा मुद्दा उपस्थित केला जातो की, ’मार्चएंड’ला घाईत काढलेले जीआर म्हणजे वर्षभर कासवगतीने चालणार्‍या प्रशासनाची शेवटच्या क्षणाची धावाधाव आहे का? इतके सारे निर्णय एकाच वेळी घेतल्यास त्यांची गुणवत्ता तपासणे शक्य होते का? निधी खर्चाचे नियोजन वर्षभर का होत नाही? हे प्रश्न दरवर्षी उपस्थित होतात आणि यंदाही ते कायम आहेत.

‘Marchend’ blast in Mantralaya; Historic record of 951 GR in four days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *