जमीन व गौणखनिजची 337 कोटींवर वसुली

31 मार्चला जमीन महसूलची रेकॉर्डब्रेक 29 कोटींची वसुली

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जमीन व गौणखनिज वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. वार्षिक महसूलवाढ अहवालानुसार, एकूण वसुलीत 20.52 कोटींची वाढ होऊन महसूल 337.14 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ही वसुली 316.62 कोटी होती. दरम्यान, 31 मार्चला आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत महसूल अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करीत होते. या एकाच दिवसात सुमारे 29 कोटींचे जमीन महसूल वसुलीचे रेकॉर्डब्रेक केले आहे.
जिल्ह्यासाठी जमीन महसूलचे 227 कोटी 75 लाख 68 हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार (महसूल) आबासाहेब तांबे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या सहकार्यातून चालू वर्षात 151 कोटी 19 लाखांची वसुली केली. गेल्या वर्षाच्या 145.67 कोटींच्या तुलनेत यंदा 5.52 कोटींची वाढ झाली आहे. यामुळे जमीन महसुलात स्थिर आणि सकारात्मक वाढ कायम असल्याचे चित्र आहे.
गौणखनिज महसुलीचे यावर्षी 250 कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात 185.96 कोटींची वसुली झाली. मागील वर्षी 170.95 कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत 15.01 कोटींची वाढ झाली आहे. यामुळे गौणखनिज विभाग हा महसूलवाढीचा प्रमुख घटक ठरला आहे.

एकाच दिवसात 29 कोटी वसूल
दरम्यान, गेल्या वर्षभरात नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या कामामुळे बराच वेळा वसुली करता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीचा आकडा फुगलेला दिसत होता. मात्र, मार्चमध्ये जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या नियोजनामुळे महसूल यंत्रणा कामाला लागली. 30 मार्चपर्यंत जमीन महसुलाची केवळ 122 कोटी 28 लाखांची वसुली झाली होती. 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी स्वतः जिल्हाधिकार्‍यांसह महसूल यंत्रणा रात्री उशिरापर्यंत वसुलीसाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे शेवटच्या एका दिवसात 28 कोटी 90 लाख 22 हजारांची विक्रमी जमीन महसुलाची वसुली झाली. महसूल यंत्रणेने शेवटपर्यंत वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महसूल विभागाचे अभिनंदन केले आहे.

ही वाढ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रभावी नियोजन, शेवटपर्यंत घेतलेला मागोवा, काटेकोर अंमलबजावणी आणि महसूल वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे फलित आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत थकबाकीदारांकडून वसुली केली. जिल्हाधिकारी रात्री उशिरापर्यंत स्वत: थकबाकीदारांशी संपर्क करीत होते म्हणून वसुली चांगली झाली.
– आबासाहेब तांबे, तहसीलदार (महसूल), नाशिक

आधी कर्तव्य, मग कुटुंब…

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च 2026 ला तहसीलदार (महसूल) आबासाहेब तांबे यांच्या आजोबांचे निधन झाले. त्यांना निरोप मिळाला. मात्र, आर्थिक वर्षाचा तो शेवटचा दिवस होता. तो महत्त्वाचा असल्याने तहसीलदार (महसूल) तांबे यांनी प्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले. 31 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत त्यांनी दुःख बाजूला सारून वसुलीसाठी थांबले. दुसर्‍या दिवशी ते गावी गेले. त्यांनी आधी कर्तव्य, मग कुटुंब हा फाम्युर्र्ला वापरला. त्याची प्रशासनात चर्चा आहे.

गौणखनिज (कोटींत)
उद्दिष्ट : 25,000.00
वसुली : 18,595.72
टक्केवारी : 74.38

जमीन महसूल (कोटींत)
उद्दिष्ट : 22,775.68
वसुली : 15,118.93
टक्केवारी : 66.38

जमीन व गौणखनिज
उद्दिष्ट : 47,775.68
एकूण वसुली : 33,714.41
एकूण वसुली टक्केवारी : 70.57

Land and minor minerals recovered at Rs 337 crore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *