46 गावे,103 वाड्यांवर पाणीबाणी
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाच्या सरासरी प्रमाणात घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मार्च महिन्यापासून बसणार्या पाणीटंचाईच्या झळा एप्रिल महिन्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. जिल्ह्यामधील 46 गावे व 103 वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
उन्हाचा पारा चाळिशीच्या घरात गेल्याने ग्रामीण भागात विहिरी, कूपनलिका आणि लहान जलस्रोत आटत चालले आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने 46 गावांसह 103 वाड्यांवर 52 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सोळा विहिरींचे अधिग्रहण केले आहे. इगतपुरीत सर्वाधिक पाच गावे व 34 वाड्या अशा एकूण 39 ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याठिकाणी 11 ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याखालोखाल येवल्यात 31 गावे-वाड्यांसाठी 19 टँकर सुरू करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोेतांमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. ग्रामीण भागात मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुकानिहाय टँकर
चांदवड – 3, देवळा – 2
इगतपुरी – 11 मालेगाव – 9
पेठ – 3, सिन्नर – 5
येवला – 19
जिल्ह्यातील सध्याची पाणीस्थिती
एकूण गावे व वाड्या प्रभावित लोकसंख्या सुरू असलेले टँकर
103 87,304 52
Shortage intensifies; Half a century of tankers in the district