शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ शुक्रवार(दि. 1 मे)पासून सुरू झाला. नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या या वसंत व्याख्यानमालेच्या मंचावर सकस, सक्षम आणि तेवढेच सुदृढ विचार पेरण्याच्या या परंपरेचे यंदाचे 103 वे वर्ष आहे.
या ज्ञानयज्ञात उद्घाटनाचे वक्ते म्हणून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज हे ‘कथा तथागताची : संदेश समतेचा, करुणेचा, प्रज्ञेचा! अर्थात, भगवान गौतम बुद्ध’ या विषयावर सलग तीन दिवस व्याख्यान देत आहेत. शहरातील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर उसळलेला श्रोत्यांचा जनसागर आणि बुद्धमयी वातावरण पाहून नाशिकमध्ये विचारांचे एक नवीन अभिसरण घडत असल्याचा प्रत्यय आला. याप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांना वसंत व्याख्यानमालेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. त्याचे वाचन मिलिंद गांधी यांनी केले. स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले की, दर्शनशास्त्राच्या क्लिष्ट विवेचनात सामान्य माणूस भांबावतो. त्यामुळे बुद्धाने दाखविलेला शांतीचा मार्ग स्वान्तसुखाय अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान, महिनाभर वसंत व्याख्यानमालेत विविध नामवंत व मान्यवरांंची व्याख्याने होणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी व त्यांचे सहकारी यासाठी अथक कार्यरत आहेत.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार बेळगाव येथील दै. तरुण भारतचे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर यांना खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके अध्यक्षस्थानी होते. डॉ. ठाकूर यांनी नाशिकच्या व पत्रकारितेतल्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. सहस्रबुद्धे यांनी सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य केले.
खालसा साजना दिनानिमित्त कार्यक्रम
खालसा साजना दिनानिमित्त गुरुद्वारा गुरू गोविंद सिंग फाउंडेशन, खालसा कॉम्प्लेक्स येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. घन घन श्री गुरू ग्रंथसाहिबजी महाराज यांच्या कृपेने सर्व उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये 70 ते 80 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
‘माझ्या शब्दांचे आकाश’चे प्रकाशन
मनपा शाळा क्र. 3, नांदूर येथील विद्यार्थिनी व कवयित्री कार्तिकी शिंदे हिच्या ‘माझ्या शब्दांचे आकाश’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अथर्वेदा फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. डॉ. गणेश लोहार यांनी तिच्या कवितांचे कौतुक व अभिनंदन केले. वर्गशिक्षिका सुनीता गांगुर्डे यांनी कविता करण्याची प्रतिभा हेरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक रिद्धीश निमसे यांनी सांगितले की, कार्तिकीने तिच्या शब्दांतून स्वतःचे एक वेगळे आकाश निर्माण केले आहे. लेखिका सुरेखा बोराडे यांनी कार्तिकीच्या कवितांमधील निरागसता आणि खोलीचे कौतुक करत तिला उद्याची मोठी साहित्यिक म्हणून गौरविले. नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर यांनी कार्तिकीच्या जिद्दीला सलाम केला.
धम्मज्योती पुरस्कार वितरण सोहळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे प्राचीन क्रांतिकारी विचारांचा वारसा असलेले दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन डॉ. विजय भगत यांनी केले. मानवतावादी बहुउद्देशीय संस्था व धम्मज्योती संपादक मंडळाच्या वतीने आयोजित धम्मज्योती विशेषांक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गौतम बुद्ध, चार्वाक, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख विचारांचा प्रभाव संविधानात दिसतो, असे त्यांनी नमूद केले. शिवदास म्हसदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे डॉ. नितीन आरोठेे होते. दुसर्या सत्रात प्रभाकर धात्रक यांना मानवतावादी पुरस्कार, प्रा. रमेश पवार यांना धम्मज्योती पुरस्कार, सुशीलाताई जोपुळकर यांना मातोश्री रमाई जीवनगौरव पुरस्कार, तर ज्योती अनिल गायकवाड यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई पुरस्कार देण्यात आला.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची व्याख्यानमाला
शंकराचार्य न्यासातर्फे आयोजित मानवी समस्या आणि मन या 7 दिवसीय व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी (दि.26) कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी मन हेच विश्वाचा अनुभव घेण्याचे मूलभूत माध्यम असून, पाच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मानव बाहेरच्या जगाशी संपर्क साधतो. बाह्य जगात घडणार्या घटना स्वतंत्र असल्या, तरी त्यांचा खरा अनुभव मनातच निर्माण होतो, असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
Inauguration of the Vasant Lecture Series at Godakathi Gyan Yagya