उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागासाठी हवामान खात्याचा ’यलो अलर्ट’
नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये 13 मेपासून पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) तीव्र तडाखा बसणार आहे. राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागासाठी हवामान खात्याने ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. ताज्या नोंदीनुसार जळगाव आणि बीडमध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. परभणी तसेच सातार्यात तापमान 43 अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि पुणे, नागपूर तसेच मुंबई प्रादेशिक हवामान विभागांनी आपापल्या क्षेत्रांसाठी सविस्तर अंदाज वर्तवला आहे. नागपूर हवामान विभागानुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस कडक ऊन आणि उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने उत्तर-मध्य व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण आणि मुंबई किनारपट्टी भागात उष्ण आणि अतिशय दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम पाणीसाठ्यावरही होऊ लागला असून, मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने 15 मे पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभाग आणि आरोग्य प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (हीट स्ट्रोक) धोका असल्याने दुपारच्या वेळी, विशेषतः कडक उन्हात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे, सुती व हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि उन्हात जाताना डोके झाकून घ्यावे. तसेच, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
Heat wave in the state for three-four days from today