संस्कृती जपायची की विकृतीला खतपाणी घालायचं?

काही दिवसांपूर्वी
घरभरणीच्या निमित्ताने
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे
निमंत्रण आले. मोठ्या थाटामाटात सगळे नियोजन करण्यात आले होते. घरभरणीच्या पूजा पूर्ण झाल्या आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीचा अर्धा तास अगदी सुंदर कार्यक्रम चालला. भक्तिगीत असो किंवा खंडोबाची कथा असो, किमान अर्ध्याच तासात जणू त्याचे स्वरूपच पालटले.
मुरळीच्या एवढ्या सुंदर वर्णनाला जणू एक कलंकच तिथे उभा ठाकला. पुरुषच तृतीयपंथीयाचं सोंग घेऊन जास्तीत जास्त अंगप्रदर्शन होईल अशा गलिच्छ प्रकारे साडी नेसून नाचावयास लागला. गाणीही अशी जी अजिबातच सभ्य नव्हती. मग एकेका दांपत्याला बोलावून थट्टा करण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ती थट्टा अगदीच मजेशीर होती, पण नंतर त्याचे रूप पालटले. त्या मुरळीवर कलंक असलेल्या व्यक्तीने परपुरुषांच्या चेहर्‍यावर हात फिरवणे, हातात हात घेणे इ. प्रकार चालू केले. आश्चर्य म्हणजे हे सगळे प्रकार त्यांच्या पत्नी हसतहसत एन्जॉय करत होत्या. यावेळी बरेच प्रकार पुढे अजून बघण्यात आले. मग ते जमिनीवर लोळून अंगप्रदर्शन करत नाचणं असो किंवा द्विअर्थी जोक्स.
हा सगळा प्रकार बघून मन थक्कच झाले. जागरण गोंधळ हा पिढ्यान्पिढ्या चालत आलेला एका शुभ प्रसंगी केला जाणारा कार्यक्रम. जागरण गोंधळ म्हणजे आपल्या पारंपरिक लोककलेद्वारे देवाची सेवा, आदर करणे, उपार्जन करणे, कुळाचार करणे, देवाचे गुणगान गाणे. देवाला जागृत करून कुटुंबाचा उद्धार करण्याची प्रार्थना करणे. वेगवेगळ्या पारंपरिक गाण्यांचा, ओव्यांचा यात सहभाग असतो. ज्यात गोंधळींसह बाकी मंडळीही उत्साहाने गातात, नाचतात. पण असे सलग एक-दोन अनुभव आले आणि जाणवले की, हा जागरणाचा कार्यक्रम तर नाहीच, पण हे म्हणजे देवाला आवाहन करून अपमान करण्यासारखे आहे. दुर्दैव हे की, सगळे प्रकार आपण एन्जॉय करतो.
असं म्हटलं जातं की, गावाकडची मंडळी आपली संस्कृती जास्त उत्तमप्रकारे सांभाळत आहेत. पण गावीच हे सलग आलेले अनुभव यावर विचार करायला भाग पाडत आहेत. मजा-हजा करण्यासाठी देवकार्याचे नाव पुढे करून हा असला तमाशा होत असेल तर खरंच त्या देवकार्याला अर्थ आहे का हो? जर आपणच आपली संस्कृती जपू शकलो नाही तर आपल्या पुढच्या पिढ्या कशा जपणार? पूजेच्या नावाखाली चालणार्‍या या प्रकारांवर आळा बसवायला हवा आणि खर्‍या पूजेचा अर्थ समजून घ्यायला हवा. देवाची मनोभावे पूजा करणं, सत्कृत्य करणं, शुद्ध, निर्मळ वर्तन करणं हे खरं देवकार्य. वाचकहो! ही लक्षणं प्रगतीची नाही, अधोगतीची आहेत, यावर खरंच विचार करायला हवा.

Should we preserve culture or encourage corruption?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *