नवी दिल्ली :
भारताच्या संरक्षणसज्जतेत मंगळवारी (दि. 2) आणखी एक मोठी भर पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुसेना यांनी मंगळवारी ’सुखोई-30 एमकेआय’ या लढाऊ विमानातून हवेतून जमिनीवर मारा करणार्या ’रुद्रम-2’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत घेतलेली ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातून सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राने स्वतःहून मार्ग निश्चित करत ठरवलेल्या लक्ष्यावर अचूक आणि थेट वेध घेतला. ओडिशातील चांदीपूर येथील ’एकात्मिक चाचणी श्रेणी’च्या विविध उपकरणांद्वारे गोळा केलेल्या डेटावरून या चाचणीची सर्व उद्दिष्टे साध्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संपूर्णपणे भारतात विकसित केलेले, घन-इंधन तंत्रज्ञानावर चालणारे हवेतून डागले जाणारे क्षेपणास्त्र आहे. शत्रूचे रडार, दळणवळण यंत्रणा आणि इतर महत्त्वाचे तळ नष्ट करण्यासाठी हे डिझाइन केले गेले आहे. हैदराबाद येथील ’रिसर्च सेंटर इम्रत’ ही या प्रकल्पाची नोडल प्रयोगशाळा आहे. डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा, ’हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ आणि विविध औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने हे विकसित करण्यात आले
आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, वायुसेना आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्व भागीदारांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, या यशस्वी चाचणीमुळे भारताचे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान अधिक परिपक्व झाले असून, प्रगत शस्त्र प्रणालीच्या क्षेत्रात ’आत्मनिर्भर भारत’ अभियानाला यामुळे मोठी गती मिळाली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन विभागाच्या सचिवांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.
‘Rudram-2’ missile successfully tested from Sukhoi