आदित्य ठाकरेंची आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (दि. 3) भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या सोबत राहील तसेच गरज पडल्यास सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लढा उभारू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, वसंत गिते, प्रथमेश गिते, माजी आमदार अनिल कदम यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या जमीन, जल आणि जंगलावरील हक्कांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी आदिवासी विकासासाठीचा निधी नेमका कुठे खर्च होतो, असा सवाल केला. आश्रमशाळा व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. पेगलवाडी येथील आदित्य आणि स्मिता या दोन विद्यार्थ्यांनी खराब रस्त्याचा व्हिडिओ तयार केल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. या भागातील शाळा केवळ कागदावर असून, प्रत्यक्षात हनुमान मंदिर व शेडमध्ये वीज आणि मूलभूत सुविधांशिवाय शिक्षण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. एका विद्यार्थिनीने आम्हाला फक्त शाळा पाहिजे, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषण करणार्या विद्यार्थ्यांची प्रकृती लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली. स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ताकद एकवटून मोठे आंदोलन उभारावे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका आणि आदिवासी पाड्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवू, असे ते म्हणाले.
आंदोलनकर्त्यांना कोणताही त्रास झाल्यास शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचे सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकार अपयशी
राज्यात मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजांसह विविध घटक आंदोलन करत असून, सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे ठाकरे यांनी सांगत सत्ताधार्यांवर टीका त्यांनी केली. राज्यात भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी, शेती आणि औद्योगिक उत्पादनासंदर्भात आतापासून नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने काम करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई-नाशिक महामार्ग, औद्योगिक क्षेत्रांतील रस्ते व पायाभूत सुविधा, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीवरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
डीजे व ध्वनिक्षेपकांबाबतचा कायदा सर्वांसाठी समान असावा, असे सांगत त्यांनी निवडक कारवाईला विरोध केला.
राहुल पावरा यांची प्रकृती चिंताजनक
आंदोलनस्थळी (दि. 3) आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना अन्न-पाणी त्याग न करता उपोषण करण्याचा सल्ला दिला. तसेच यावेळी आंदोलनकर्ते राहुल पावरा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णवाहिकेत हलविण्यात आले. तसेच त्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली.याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत धीर दिला.
We will launch a struggle by bringing everyone together.