नाशिक/सिन्नर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणार्या बोरखिंड येथील नवीन समृद्धी महामार्ग इंटरचेंजला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. नाशिकरोड-भगूरमार्गे सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथे समृद्धी महामार्गाला जोडणार्या या प्रकल्पासाठी तब्बल 343 कोटी 99 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरी अथवा गोंदेपर्यंतचा फेरा मारण्याची गरज राहणार नाही. नाशिकरोड ते समृद्धी महामार्गाचा प्रवास अवघ्या 17 किलोमीटरवर येणार आहे.
सध्या नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी पिंप्री सदो इंटरचेंजसाठी सुमारे 55 किलोमीटर, तर भरवीर इंटरचेंजसाठी सुमारे 31 किलोमीटर अंतर पार करावे लागते. बोरखिंड इंटरचेंज झाल्यानंतर नाशिकरोडहून समृद्धी महामार्गावर पोहोचण्यासाठी अवघे 17 किलोमीटर अंतर राहणार असून, हा प्रवास सुमारे 30 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित नाशिक अंतर्गत रिंगरोडपासून बोरखिंड इंटरचेंजचे अंतरही केवळ 12.50 किलोमीटर राहणार आहे.
डुबेरे ते भगूर 9.30 किमीचा मार्ग
बोरखिंड इंटरचेंज आणि डुबेरे ते भगूर रस्त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. प्रकल्पांतर्गत डुबेरे, सोनारी, सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, विंचूर दळवी ते भगूर या मार्गावर 9.30 किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित केला जाणार आहे. 10 मीटर रुंदीचा टू-लेन काँक्रीट रस्ता प्रस्तावित असून, 120 मीटर लांबीचा मोठा पूल, 40 व 20 मीटरचे दोन मध्यम पूल, 15 पाईप मोर्या आणि 35 युटिलिटी पाईप क्रॉसिंग उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय 1,500 मीटर संरक्षक भिंत, 2,500 मीटर टो-वॉल आणि पांढुर्ली, विंचूर दळवी व भगूर परिसरात एकूण 2,200 मीटर आरसीसी गटारे बांधली जाणार आहेत. इंटरचेंज, रस्ता काम आणि टोल प्लाझाचीही प्रकल्पात तरतूद आहे.
तातडीने कार्यवाहीच्या सूचना
सिंहस्थाच्या काळात नाशिक शहर व परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डुबेरे-भगूर मार्गाची समृद्धी महामार्गाशी होणारी जोडणी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. बाहेरील भागातून येणार्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास नाशिककडे येणार्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पात संरक्षक भिंती, आरसीसी व कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी, पेव्हर ब्लॉक, बसथांबे, वृक्षलागवड आणि सौंदर्यीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत. सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, भूसंपादन आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित आवश्यक कामांचाही समावेश आहे. शासनाने तांत्रिक मंजुरीपूर्वी आवश्यक वन व पर्यावरणविषयक परवानग्या, भूसंपादन आणि वाहतूक अडथळ्यांची खातरजमा करण्याचे निर्देश दिले आहेत. सिंहस्थाची निकड लक्षात घेऊन निविदा प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : आ. कोकाटे, आ. आहिरे
सभागृहात भाषण करून किंवा एखाद पत्र समाज माध्यमातून प्रसारीत करून विकासकामांसाठी निधी मंजूर होत नसतो. त्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो. सिंहस्थ कुंभमेळाच्या अनेक बैठकांमध्ये, भेटींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सातत्याने देवळाली मतदार संघ म्हणून आ. सरोज आहिरे आणि सिन्नरचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश आले. काल नाशिकरोड-देवळाली कॅम्प-भगूर-पांढुर्लीकडून समृद्धी महामार्गाला जोडणी मिळावी या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वाक्षरी करून 343 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. नाशिकला समृद्धी महामार्गाशी जोडणारा हा मार्ग भविष्यात नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनेही या मार्गाचे महत्त्व मोठे आहे. व्यापारी वर्ग, उद्योग-व्यवसायसाठी मार्गाचा नियमित वापर करणार्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, नाशिकच्या विकाङसाला या जोडणीमुळे निश्चितच नवी गती मिळेल, असा दावा आ. माणिकराव कोकाटे आणि आ. सरोज आहिरे यांनी केला.
प्रकल्पात काय होणार?
निधी : 343 कोटी 99 लाख रुपये
रस्ता : डुबेरे-सोनारी ते भगूर मोठे पूल : 4
लहान पूल : 4 वाहतूक भुयारी मार्ग : 7
बॉक्स कल्व्हर्ट : 5 पाइप कल्व्हर्ट : 2
सिन्नरकरांचाही वेळ, इंधन वाचणार
बोरखिंड इंटरचेंजचा फायदा सिन्नरकरांनाही होणार आहे. सध्या सिन्नरहून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी गोंदे येथे जावे लागते. मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहनांना बोरखिंडमार्गे समृद्धीवर प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अंतरासोबतच वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
Nashik residents will no longer have to take a long detour to access the Samruddhi Expressway!