शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे प्रशासनाचे पाप

नाशिकरोड भागातील रस्त्यांचा पंचनामा
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डयांचे साम्राज्य हे महापालिका प्रशासनाचे पाप असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून दशरथ पाटील हे शहरातील रस्त्यांची पाहणी करत पंचनामा करीत आहेत. काल दशरथ पाटील यांनी नाशिकरोड विभागात फिरून रस्त्यांच्या खड्डयांचा पंचनामा केला.
पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने हजारो कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात घालून रस्ते चकचकीत केल्याचा देखावा केला. मात्र पावसाळ्याय अनेक भागातील रस्ते पाण्यात वाहून गेल्याचे निदर्शनास आले.तेथील डांबर तर सुक्ष्मदर्शकातून बघावे लागते. काही ठिकाणी तर रस्त्यांवर अक्षरशः मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे किरकोळ तसेच मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे अनेकजण जायबंदी झाले तर काहींना प्राणासही मुकावे लागले.या प्रश्नाबाबत अनेक पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठविला.मात्र महापालिका प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून बोळवण केली. मनपामध्ये लोकप्रतिनिधी राजवट नसल्याने प्रशासन मनमानी कारभार करीत असून नागरिकांना नाहक वेठीस धरले जात आहे.जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा या प्रश्नात लक्ष घालून नाशिककरांना न्याय द्यावा,असे साकडे त्यांना घालणार असल्याचेही पाटील पुढे म्हणाले.

या भागाची केली पाहणी
वडनेर कारगिल गेटपासून पंचनाम्याला सुरुवात झाली.नंतर विहितगाव,मथुरारोड चौक येथे नागरिकांशी पाटील त्यांनी संवाद साधला.पुढे लॅमरोड,विहितगाव बागुलनगरमार्गे रेल्वे फाटक मार्ग,जुना चेहडी रोड, प्रसाद धुनी, सिन्नर फाटा चौक येथे नागरिकाशी संवाद साधला.विविध ठिकाणी नागरिकांनी स्वयंचलित सिग्नलची मागणीही केली.येथून एकलहारा रोड,बिटको मार्गे जेलरोड, पाण्याच्या टाकीपासून पवारवाडी,कॅनाल रोड परिसर तेथून शिवाजी महाराज चौक मार्गे नारायण बापू नगर रोड ने हनुमाननगर, उपनगर मार्केटरोड,जयभवानी चौक, मार्गे फर्नांडिसवाडी,डावखरवाडी, के.जे.मेहता हायस्कूल, जगताप मळा,गायखे कॉलनी,दत्तमंदिर रोड,मुक्तीधाम रोड मार्ग सोमाणी गार्डन, येथून मा. गांधी पुतळ्यापर्यंत पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *