कर्जमुक्तीसाठी ई-केवायसीची अट

जिल्ह्यातील 8,697 शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला असून, पहिल्या टप्प्यातील 35 हजार 890 पात्र शेतकर्‍यांपैकी 27 हजार 283 जणांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण झाले आहे. उर्वरित 8 हजार 697 शेतकर्‍यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत एकूण 68 हजार 859 शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 35 हजार 890 खातेदार पात्र ठरले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 18 हजार 453 आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 17 हजार 437 खातेदारांचा समावेश आहे.
2 ऑगस्टअखेर 27 हजार 283 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँका तसेच जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (एलडीएम) आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व मआपले सरकारफ आणि ममहा-ई-सेवाफ केंद्रांवर ई-केवायसीची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध असून, या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
योजनेअंतर्गत दुसरी पात्र लाभार्थी यादी 15 ऑगस्टनंतर जाहीर होणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकर्‍यांच्या थकीत कर्जाची रक्कम थेट संबंधित खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज घेण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. तसेच, ज्यांनी अद्याप अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने करून घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

E-KYC condition for loan waiver

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *