8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ
सिन्नर : भरत घोटेकर
कृषी विभागाच्या योजनांसाठी 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहे. शेतकर्यांना या ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, असे असताना जिल्हाभरातून आतापर्यंत 13 लाख 78 हजार 230 शेतकर्यांपैकी अवघ्या 5 लाख 2 हजार 318 शेतकर्यांनीच ओळखपत्र काढले आहे. म्हणजेच अॅग्री स्टॅगच्या माध्यमातून फार्मर आयडी काढण्याचे अवघे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. अजूनही 8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांनी ओळखपत्र काढले नसल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एकूणच शेतकरी ओळखपत्रा बाबत फारशी जागृती झाली नसल्याचेच दिसून येत आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ जलदगतीने व परिणामकारकरित्या शेतकर्यांना देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या आणि त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, शेतांचे भू-संदर्भिकृत माहिती संच अशी माहिती एकत्रितरीत्या तयार करण्यात येत आहे.
शेतकर्यांचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकर्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे. दरम्यान,
शासनाच्या सक्तीमुळे फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकर्यांना आता धावपळ करावी लागणार आहे.
शेतकरी ओळखपत्राच्या आधारे पिक विमा, विविध अनुदान खात्यात जमा करणे अधिक सुलभ होणार आहे. हे ओळखपत्र थेट महाडिबीटीला जोडले जाणार आहे.
सीएससी चालकांकडून शेतकर्यांची लूट
शेतकरी जवळच्या सीएससीवर जाऊन अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरले जात नाही. सीएससीचालकांना एका अर्जासाठी 15 रुपये सरकारमार्फत दिले जातात. त्यामुळे शेतकर्यांनी सीएससी चालकांना शुल्क देऊ नये, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएससीचालक शेतकर्यांकडून 100 ते 150 रुपये नोंदणीसाठी घेत आहेत. याबद्दल शेतकर्यांनी तक्रार केली आहे. परंतु अद्यापही या सीएससीचालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांची लूट होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. कृषी विभाग मात्र नोंदणीसाठी शुल्क देऊ नये, असं आवाहन करत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
केवळ वडिलांनाच ओळखपत्र
सातबारा उतार्यावर ज्यांची नावे आहेत, त्या शेतकर्यांना हे ओळखपत्र काढावे लागणार आहे. घरात सदस्य चार अन् सातबारा वडिलांच्या नावावर असेल तर केवळ वडिलांनाच ओळखपत्र काढता येणार आहे. पण, या वडिलांसोबत या चारही सदस्यांची नावे सातबारा उतार्यावर असतील, त्या सार्यांनाच ओळखपत्र काढता येईल.
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…
सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील…