खोदकामामुळे साचले पाणी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
नाशिक : प्रतिनिधी
बर्याच प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी (दि. 23) नाशिक शहरासह जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर दुपारच्या सुमारास शहराच्या विविध भागांत जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी सिंहस्थाच्या विकासकामांमुळे ठिकठिकाणी निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने नाशिककरांचा संयम पाहिला.
शहरातील सीबीएस, शालिमार, सिडको, त्र्यंबकरोड, पंचवटी, मुंबई नाका, पाथर्डी फाटा आदी भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवरील पादचारी व वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेकांनी दुकाने, बसथांबे व इमारतींचा आसरा घेतला.
सिंहस्थाच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. अनेक रस्त्यांचे खोदकाम आणि वाहतुकीतील बदल यामुळे आधीच वाहनचालक त्रस्त आहेत. त्यात पावसाची भर पडल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर पपया नर्सरी ते एबीबी सर्कलदरम्यान वाहतूक कोंडी झाली. मुंबई नाका, सारडा सर्कल आणि पाथर्डी फाटा परिसरातही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पंचवटी परिसरात दुपारच्या सुमारास ढग दाटून आल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. मखमलाबाद, आडगाव, वरवंडी, म्हसरूळ आणि नांदूर-मानूर परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. काही भागांत गारांचाही वर्षाव झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
जुना आडगाव नाका, मखमलाबाद रोड, पंचवटी कारंजा, नाग चौक, गजानन चौक, रामवाडी, अमृतधाम चौक आणि म्हसरूळ परिसरात पाणी तुंबल्याचे चित्र होते. गंगाघाट परिसरातही नेहमीप्रमाणे जलनिस्सारण व्यवस्थेच्या मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
शहरातील बाजारपेठांनाही पावसाचा फटका बसला. रस्त्यावरील भाजीपाला आणि फळविक्रेत्यांना माल सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. काही ठिकाणी मालाचे नुकसानही झाले. त्यामुळे व्यापार्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहराबरोबरच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि पेठ तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील कामांना वेग मिळणार असून, भात लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांची शेतीकामाची लगबग सुरू झाली आहे.
Heavy rain in Nashik