अग्रलेख

वाढता वाढता वाढे महागाई

आशिया, आफ्रिका आणि युरोप या तीन खंडांच्या सीमेवर असलेला जगातील एक महत्त्वाचा भूराजकीय भाग म्हणजे मध्यपूर्व (मिडलईस्ट). भौगोलिकदृष्ट्या हा भाग मुख्यत्वे नैऋत्य आशिया आणि उत्तर आफ्रिकेचा काही हिस्सा मिळून बनला आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इराण, इराक, इस्रायल, पॅलेस्टाइन, इजिप्त (हा आफ्रिका खंडातील), तुर्कस्तान (आशिया आणि युरोप दोन्ही खंडांत), कतार, कुवेत, ओमान, येमेन, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉन या देशांचा मध्यपूर्वेत समावेश आहे. हा भाग जगातील सर्वांत मोठा खनिज तेल (क्रूड तेल) आणि नैसर्गिक वायूचा साठा असलेला प्रदेश आहे. इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू या जगातील तीन मोठ्या धर्मांचा उदय व उत्पत्ती याच भागात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सागरी मार्गांच्या (सुएझ कालवा) दृष्टीने हा भाग अत्यंत मोक्याचा मानला जातो. अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर जोरदार हवाई हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेत अशांतता निर्माण झाली. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली. इंधनाचे दर भडकल्याने सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. भारतालाही फटका बसला. भारतात इंधनटंचाई निर्माण झाली. इंधनाचे दरही वाढले. या परिस्थितीवर आपण मात केल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात महागाई वाढली आहे अन् धान्यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत असल्याचे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. युद्धजन्य परिस्थितीत महागाई वेगाने वाढली. सरकारने जून महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) आकडेवारीनुसार, महागाई 4.3 टक्क्यांवर पोहोचली. जूनमध्ये किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईचे लक्ष्य 4 टक्के ठेवले होते, ते ओलांडले गेले आहे. महागाईच्या चढत्या आलेखाचा जून हा सलग सहावा महिना आहे. ग्राहकांना त्याचे तीव्र चटके बसत आहेत. जानेवारीपासून किरकोळ महागाई वाढत आहे. वर्षअखेरीस हा दर 2.74 टक्के होता. त्यानंतर
फेब्रुवारीत 3.21 टक्के, मार्चमध्ये 3.40 टक्के, एप्रिलमध्ये 3.48 टक्के आणि मे महिन्यात 3.93 टक्के होता. ‘वाढता वाढता वाढे’ म्हणतात, तशी महागाई वाढत आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमती ही चिंतेची बाब आहे. अन्नधान्याची महागाई मे महिन्यातील 4.38 वरून जूनमध्ये 5.32 टक्क्यांपर्यंत वाढली. जानेवारी 2025 नंतर प्रथमच महागाईने रिझर्व्ह बँकेचे 4 टक्क्यांचे लक्ष्य ओलांडले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 13 जुलै रोजी महागाई दराची आकडेवारी प्रसिद्ध केली. मे महिन्यातील 3.93 टक्क्यांवरून जूनमध्ये हा दर 4.38 टक्क्यांपर्यंत वाढला. अन्नधान्याच्या किमतींमधील सततची वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय आहे. मूळ महागाईचा दर 4 टक्क्यांवर राहील आणि त्याच्या वर व खाली दोन टक्क्यांची मर्यादा राहील, याची खात्री करावी, असे निर्देश सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला यापूर्वीच दिले आहेत. जूनमधील 4.38 हा दर या 4 टक्क्यांच्या जवळपास असला, तरी त्याने ही मर्यादा ओलांडली आहे. किरकोळ महागाईतील वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होतो. वाढत्या अन्नधान्याच्या किमतींचा घरगुती बजेटवर परिणाम होतो. कडधान्ये, भाज्या आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. परिणामतः सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन खर्चात वाढ होते. यावर पर्याय म्हणून ग्राहकांना त्यांच्या खरेदीच्या सवयींमध्ये बदल करावा लागू शकतो. मात्र, अन्नधान्य ही दैनंदिन गरजेची वस्तू असल्याने तिला वगळता येत नसल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण पडत असतो. अन्नधान्य महागल्यामुळे जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे किमतवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या 4 टक्क्यांच्या मध्यवर्ती लक्ष्याच्या वर गेला आहे. यावर्षी जानेवारीपासून अंमलात आलेल्या नवीन मालिकेंतर्गत किरकोळ महागाईने 4 टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नवीन मालिकेचे पायाभूत वर्ष 2024 आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस-एनएसओ) जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीनुसार, जूनमध्ये सर्वाधिक महागाई असलेल्या पहिल्या पाच वस्तूंमध्ये चांदी, सोने, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने; आले, टोमॅटो, आणि बेदाणे व मनुका यांचा समावेश होता. सर्वांत कमी महागाई असलेल्या पहिल्या पाच वस्तूंमध्ये बटाटा, मटार, मोटार कार आणि जीप, जिरे आणि मोटारसायकल व स्कूटर यांचा समावेश होता. देशाचा सरासरी महागाई दर 4.38 टक्के असला, तरी ग्रामीण आणि शहरी भागांसाठीच्या संबंधित ग्राहक किंमत निर्देशांकानुसार तो अनुक्रमे 4.74 टक्के (ग्रामीण) आणि 3.92 टक्के (शहरी) होता. ‘वाढता वाढता वाढे’ म्हणतात, तसे महागाई सर्वत्र वाढत आहे.

Inflation keeps spiraling upwards.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago