महाराष्ट्र

लोकांना किती दिवस मूर्ख बनवणार

सध्या जिकडे-तिकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जिकडे तिकडे खोटारडी माणसं मोठमोठ्या खोट्या थापा मारून लोकांना वेडी समजू लागतात. लोकांचेच लुटलेले पैसे लोकांना भरभरून वाटू लागतात. यांची सत्तेवर येण्यापूर्वीची संपत्ती किती होती याचा विचार केला तर यांनी अनेकांना लुटून आपले घर भरलेले असते आणि या काळात मग पार्ट्या जोर धरू लागतात. आपण किती पाण्यात आहोत याचा विचार न करता इतरांविषयी खोटेनाटे सांगून मतदारांना सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागतात. जे सत्य आहे, जे सर्वांना सर्व माहीत आहे असे असताना यांना वाटतं लोक विसरले इतके ते लोकांना मूर्ख समजतात. हातात कडे, अंगठी, गळ्यात चेन मिरवत लोकांना आपल्या वाढलेल्या संपत्तीची जणू जाणीव करून देतात. लोक तात्पुरत्या आमिषाला बळी पडून मतदान करतात आणि मग पुढील 5 वर्षे माफ करा आता 7 /7 वर्षे त्यांच्या नावाने बोटं मोडत असतात. कुठलाही सारासार विचार न करता भ्रष्ट माणसांचे समर्थन करू लागतात. या काळात भाड्याची माणसं त्यांची तळी उचलायला हजर असतात. कारण अनेकांची पोट खरं तर त्यावरच चालू आहेत. ही माणसं समाजासाठी दुर्दैवी आहेत. खोटं असून लोकांना खरं करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. काळ बदलला, समाज बदलला आणि प्रामाणिक माणसं योग्यता असूनही निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही ही खंत कुणालाही वाटेनासे झाली. सर्व काही सुबत्ता असताना किरकोळ आमिषाला बळी पडू लागली हे बदलण्यासाठी ज्याचा समाजावर विश्वास आहे अशा गुरुजनांनी आता याचा विचार करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. लोकांकडून विविध मार्गाने जमवलेली संपत्ती या प्रकारे निवडणूक काळात लुटणार्‍यांना सोडू नका. ते देत असतील तर जरूर घ्या, पण यांना मतदानातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि चांगली माणसं या प्रवाहात आली पाहिजेत. जातीचा, माझा नातेवाईक, संस्थेचा, माझ्या भागाचा, असा विचार न करता चोरांपासून आता सावध राहिले पाहिजे. करून सरून नाकारणारे कोणत्या तोंडाने तुमच्यासमोर मतं मागायला येतात याची भीती त्यांना वाटायला पाहिजे. निवडणुका येतात जातात आणि चांगली माणसं तो दिवस सोडला की पुन्हा आपल्या नेहमीच्या उद्योगात रमतात त्यांच्यावर खडे फोडण्यासाठी. सत्तेतले हे दलाल सत्तेवर आले की उपजीविकेचे विविध मार्ग शोधून काढतात. ना भय ना लज्जा या प्रकारची. आपण ज्या सत्तेवर आहे तिथल्या कर्मचार्‍यांची पिळवणूक करून पैसे लुटणे, मग त्याच्या युनिफॉर्मची शिलाई ही काहींना पुरत नसते तर काहींना आपल्या घराचा रंगही सत्तेतून हवा असतो. काहींच्या गाड्या दुरुस्त करण्यासाठी कर्मचार्‍याचा घामाचा पैसा हवा असतो. माणसं आपल्यातलीच पण जवळ घ्यावीत की नाही असे वागतात. इतरांच्या दुःखावर हसणारी आणि इतरांच्या सुखावर जळणारी!! यांच्या नात्यालाही वेगळाच रंग असतो, जिथे खातील तिथेच छेद करणारी, गोड बोलून लुटणार्‍या या टोळीला लोकांनी खरं तर याचवेळी ओळखलं पाहिजे. दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. खरं बोललं तर यांच्या नाकाला मिरच्या तर झोंबणारच ना, मग हे कुणाच्या तरी नावानं बळेच कोल्हे कुई सुरू करणार ना, त्याला आधार ना, जनाधार !!
याददाश का कमजोर होना, यह कोई बुरी बात नहीं जनाब, मगर चोरी करके, सुख की निंद न मिलना, यह बहोत बुरी बात है। यह मत समझो की लोग बहोत जलदि भूल जाते है कोई बात, वक्त आया तो सबकुछ याद भी कर लेते है लोग॥
निवडणुका आल्या की हे सर्व सुरू होतं. खरं ते रुचत नसतं आणि खोटं बळजबरीने लादण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो. जिथे असतात तिथले लोक मात्र उघड होत नसतात. कारण सत्तेत असल्याने त्यांना त्रास होतो. पण सत्तेतून पायउतार झाले की मग यांच्याजवळही कोणी उभे राहत नसते हे सत्य कुणीही नाकारत नसतं. सत्ता असते ती कुणाची बटीक नसते, आज असते तर उद्या जातही असते हे या लोकांना कोण समजावणार? सत्तेची मग्रुरी जास्त दिवस टिकत नसते आणि लोकांचा घामाचा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी दुपटी तिपटीने भरावाच लागतो हे मात्र पूर्ण सत्य
आहे.
के. के. अहिरे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago