नाशिक : वार्ताहर
शहर हद्दीतून १५ दिवसांसाठी हद्दपार केलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या सात मनसे पदाधिकाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याबाबतचे आदेश देखील पोलीस अधीक्षक व सरकारवाडा पोलीसांना देण्यात आले.
४ मे रोजी मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजामध्ये भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिले होते . त्यानुसार मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर , जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह शहरातील मनसे पदाधिकारी सचिन भोसले , मनोज घोडके , सत्यम खंडाळे , अमित गांगुर्डे , संतोष कोरडे , निखील सरपोतदार , संजय देवरे आदींना पोलीसांनी शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा दृष्टीने नोटीसा बजाविल्या होत्या. त्यानंतर 4 मे रोजी सातपूर , सरकारवाडा , इंदिरानगर पोलीस ठाण्यात या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.पोलीसांनी या सर्व सात मनसे पदाधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अटक करत मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी अटी व शर्तीच्या अधिन राहून सर्वांना 15 दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले.
या आदेशाविरुद्ध मनसे कार्यकत्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी (दि.10)
सत्र न्यायाधीश एम.ए. शिंदे यांच्या
न्यायालयात सुनावणी झाली असता शिंदे यांनी मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी काढलेले हद्दपारीचे आदेश स्थगित केले.