♦ कातकरी वस्तीतील अंधार दूर
♦ रेमंडमधून सुरळीत वीजपुरवठा
♦ सौरऊर्जेमुळे वीजबिल खर्च वाचला
♦ शेतीला अखंडित विजेमुळे समाधान
♦ पाडळीत 33 केव्हीची लाइन मंजूर
अस्वली स्टेशन : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्हे येथील वीज कार्यालयाकडून 30 गावांत प्रभावी अंमलबजावणी होत आहे. कुर्हेगाव येथे कातकारी वस्तीत 20 वर्षांपासून वीजपुरवठा नव्हता. महावितरणच्या पुढाकारातून 24 तास वीज मिळाली. आमच्या जीवनातील अंधार कायमचाच दूर झाल्याचे लक्ष्मण हिल्लम यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी कार्यक्षेत्रातील गावांना सिंगल फेज होता. आता थ्री फ्रेज केला. दोन वर्षांपूर्वी 132 केव्ही विद्युत सप्लाय अंबड उपकेंद्रातून होत होता. लाइनची लांबी अंदाजे 25 किलोमीटर असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. रेमंड, गोंदे येथून वीज घेण्यात आल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला. वाडीवर्हे वीज वितरण उपकेंद्राच्या माध्यमातून 30 गावांना सुरळीत व 24 तास वीजपुरवठा मिळत आहे. काही वाड्यावस्त्यांना वीज पोहोचल्याने त्यांना अंधाराचा होणारा सामना थांबला आहे. शेतकर्यांच्या अडचणी दूर झाल्या असून, वाडीवर्हे, पाडळी, शेणवड उपकेंद्रातून शेतकर्यांना 18 मेगावॅट वीज उपलब्ध झाल्याने शेती सिंचनाखाली येत आहे. सौरऊर्जेमुळे पारंपरिक वीज कनेक्शनची गरज भासत नाही, ज्यामुळे वीजबिलाचा खर्च वाचतो, डिझेल पंपांवर अवलंबून न राहता, दिवसा सौरऊर्जेवर पंप चालवून पिकांना सिंचन करता येते, असे शेतकर्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील वाडीवर्हे, मुरंबी, सांजेगाव, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, बेलगाव कुर्हे, कुर्हेगाव, नांदूरवैद्य, अस्वली, जानोरी नांदगाव बुद्रुक, शेणवड, कृष्णनगर, बारावाड्या, गरुडेश्वर आदी गावांतील शेतकर्यांना फायदा झाला.
सदर प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी मुख्य अभियंता लटपटे, अधीक्षक अभियंता थूल, कार्यकारी अभियंता झटकरे, उपकार्यकारी माळी, तत्कालीन मुख्य अभियंता कुमठेकर, अधीक्षक अभियंता पडळकर, दरोली, कार्यकारी अभियंता डोंगरे, ठाकरे, उपकार्यकारी अभियंता पाटील, प्रजापती, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास गेला आहे.
सध्याच्या परिस्थितीत पाडळी व शेणवड या भागात वीजपुरवठ्याची समस्या आहे. त्यासाठी नवीन 33 केव्ही लाइन मंजूर असून, काम प्रगतीपथावर आहे. ज्या वेळेस हे काम पूर्ण होईल, त्यावेळी वाडीवर्हे कक्षांतर्गत सर्व परिसरात शहरी भागासारखा वीजपुरवठा सुरळीत सुरू राहील. शेतकरी, ग्राहकांंचा फायदा होईल. वीज उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल.
– धवल आगरकर, सहाय्यक अभियंता, वाडीवर्हे
‘Prakash’ after 20 years in the Katkari settlement of Kurhegaon