‘ती’ आवरून जाते ना…?

स्वाती पाचपांडे

घाईघाईने ती घराबाहेर पडली आज मस्टर वेळेत गाठायचे होते..सकाळी परदेशात असलेल्या मुलांशी बोलण्यात वेळ भुरकन उडून जातो मग खूप अशी घाई होते..घरातील जमेल तितके आवरून जाण्याचा मानस असतोच… निघतांना समोर दिसूनही शेजारच्या आयाबायांशी बोलणे राहूनच जाते.. काहीजणी असुयेने तर काहीजणी कौतुकाने तिच्याकडे नेहमी बघत असतात..खरंतर पन्नाशी ओलांडलेली ती एक उच्चशिक्षित स्त्री..काही गोष्टी आयुष्यात राहूनच गेल्या आहेत ही खंत नको म्हणून नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असे.. कारण अध्यापनात तिला मनापासून स्वारस्य आहे..आपल्याकडे ज्ञान आहे तर ते इतरांना नेहमीच वाटले पाहिजे या भावनेने ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे.कारण त्यातूनच स्व ओळख निर्माण होत असते.
त्या दिवशी तिला आश्‍चर्यच वाटले की तिच्या सासूबाईंना शेजारची बाई विचारत होती की ती घरातले सगळे काम करून मग बाहेर पडते ना..?की तुम्हाला करावे लागते? अर्थातच सासुबाई म्हणाल्या की ती सकाळी उठून नवर्‍याचा डबा करते आणि आमचाही स्वयंपाक करून मग बाहेर पडते..तितकी प्रामाणिकता त्यांच्यात नक्कीच होती..काही धूर्त नातेवाईक स्त्रियाही तिच्या मागे फोनवरून कारभार करत तेव्हा ती दुखावली जात असे..
गोष्ट छोटीशीच होती पण विचाराधीन करून गेली..खरंच एक स्त्री दुसर्‍या स्त्रीला असे मोजतमापत का असावी? म्हणजे यंत्र आहे का ती की तिने घरातले ही सगळे वेळच्या वेळेत करावे आणि मग स्वतःच्या नोकरीसाठी किंवा करीयरसाठी वेळ द्यावा..जेव्हा तिची मुले लहान होती तेव्हा कुणीही सांभाळायला आले नव्हते की तिनेही कुणाला बंधनात टाकले नव्हते..संसाराच्या चाकरीत अडकून गेलेली ती आता कुठे मान वर काढत होती जेव्हा हातातून खूप काही निसटून गेले होते..शेवटी काय तर वर्तमानकाळ महत्वाचा असतो म्हणून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती..स्वतःला चांगल्या गोष्टीत रमवत होती पण काही रिकामटेकड्या लोकांना ते रुचत नसावे..तिला अकारणच सोसावे लागायचे..प्रत्येकाकडे जगण्यासाठी पर्याय उपलब्द असतात..प्रश्न असतो तो योग्य पर्याय निवडण्याचा आणि तिने तो निवडला होता.. आजही काही अपवाद वगळता खूप जणींसाठी नोकरी आणि घर ही तारेवरची कसरत असतेच असते पण त्यात आनंदही असतो की आपण शिक्षणाचा उपयोग करत आहोत..संसारासाठी अर्थार्जन ही तितकेच महत्वाचे..तेच आताच्या काळातील मुली जेव्हा करियर करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देणार्‍या सासवा पण ह्याच समाजात आहेत..तिला सुखद धक्का बसला जेव्हा तिच्या तरुण सहकारी सांगत होत्या की केवळ सासूबाईंमुळे मी नोकरी करू शकते..मुलांना त्या जीव लावतात..प्रश्न आहे बाहेरच्या मंडळींचा ज्यांना दुसर्‍यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते..असो प्रत्येक स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला समजून घेतलेच पाहिजे..किती वर्षे तिला त्याच पारंपरिक भूमिकेत आपण डांबून ठेवणार आहोत? तिच्यात बाहेरच्या जगात काम करण्याचे कौशल्य आहे तर तो सन्मान तिला दिलाच पाहिजे..विशेषतः चुल आणि मूल इतकेच विश्व असणार्‍या काहींना तिचे हे स्वातंत्र्य मान्य नाही..फार मोठी खंत आहे की बायकाच बायकांना समजून घेत नाही..किंवा मोकळ्या मनाने कौतुक करत नाही..ती ही एक माणूस आहे..तिला आता घराबाहेर पडणे भाग आहे कारण ती काळाची गरज आहे..ती घरात बसली तर कुटुंबाची प्रगती मंदावणार नाही का.?वाढती स्पर्धा,महागाई ह्यातून मार्ग काढायचा आहे तर तिला क्रियाशील असलेच पाहिजे..थोडे बदलायला काय हरकत आहे..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *