आधारवड

तनुजा बागडे-धामणे

रविवारी सुट्टी असल्याने आणि घरी छोटी छोटी पाहुणे मंडळी आल्याने त्यांना दाखवण्याच्या निमित्ताने पुण्यात शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती आणि तुळशीबागेत जाण्याचा योग आला. देवदर्शन, खरेदी आणि खाणेपिणे यासाठी तीन ते चार तास चांगलीच पायपीट झाली. खूप फिरल्याने मुलंही थकलेली होती. चालण्याची ताकद आता कोणातही उरलेली नव्हती.
एव्हाना घड्याळात रात्रीचे दहा वाजले होते, तेव्हा ऑटो बुक करून घरी जाण्यावर सगळ्यांचे एकमत झाले. ऍपवरून रिक्वेस्ट टाकली पण कुणीही ऍक्सेप्ट करत नव्हतं. बर्‍याच वेळानंतर एक ऑटो बुक झाली.

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत समारंभ

थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ती आली. आम्ही मुलांना घेऊन त्यात बसलो. ड्रायव्हर काका बर्‍यापैकी वयस्कर वाटत होते. अंगात खाकी रंगाचा ड्रेस, पांढरी दाढी वाढलेली, हातावर आणि चेहर्यावर सुरकुत्या पडलेल्या, थोडीफार हातांची थरथर जाणवत होती. ते बघून माझ्या मनात कुठेतरी कालवाकालव झाली. सहज म्हणून बाबांना( त्यावेळी त्यांना काकापेक्षा बाबा म्हणणं जास्त संयुक्तिक वाटलं) मी प्रश्न केला, बाबा वय काय असेल तुमचं? तो प्रश्न ऐकून त्यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटली. जी मला आरशातून अगदी स्पष्ट दिसली.

एक किलो टोमॅटोसाठी मोजावे लागताहेत 80 रुपये

मला म्हणाले, पुढच्या महिन्यात बेटा, सत्तरचा पूर्ण होऊन एक्काहत्तरव लागेल.
मी अवाक झाले, तेवढंच मनात कुतूहलही निर्माण झालं. बाबा मग एवढ् उतार वय असूनही रिक्षा का चालवता? तुम्ही आराम करायला हवा आता. साहजिकच माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडले.त्या वेळी बाबांनी जे उत्तर दिलं ते ऐकून मी थक्क झाले आणि घरी आल्यावर हा लेख लिहायला लेखणी हातात घेतली गेली . बाबा म्हणाले, या वयातही रिकामं बसवत नाही बघ..आयुष्यभर कष्ट केले. गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून पुण्यात रिक्षा चालवतो आहे. जोपर्यंत काम होईल तोपर्यंत करायचं, हा विचार करून रोज लवकर उठतो, सगळं आटोपून शनिवारवाड्यावर येतो. तिथून मी दिवसभर जेवढ्या होतील तेवढया ट्रिपा करतो. राहायला मी आकुर्डीला आहे. रोज रात्री बारा वाजता घरी जातो. मग जेवण करून झोपतो..

धक्कादायक : तरुणाला हात पाय बांधून धरणात फेकले

हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन केलं,आकुर्डी ते शनिवारवाडा कमीतकमी एकवीस, बावीस किलोमीटर अंतर असेल. एवढ्या लांब येऊन बाबा रिक्षा चालवतात आणि एवढ्या उशीरा घरी जातात. माझी उत्सुकता शिगेला पोहचली. म्हटलं, बाबा घरी कोण कोण असतं तुमच्या ? बाबा म्हणाले, एक मुलगा आहे, सून,नातवंड आहेत. मुलगा रिटायर झाला आहे. त्याला पॅरालिसिस झाला म्हणून त्याने व्हीआरएस घेतला. थोडीफार पेन्शन मिळते पण तेवढ्याने घरखर्च भागत नाही. नातू पण आता बावीस वर्षांचा झाला आहे,तो अजुन शिकतो आहे. आणि त्यात आपल्यासारख्याचा भार कुठे त्यांच्यावर..म्हातारं माणूस म्हणजे अडगळच. आजकालच्या जगात तरी तसंच झालं आहे. दिवसाला जेवढ्या होतील तेवढ्या ट्रिपा करतो. पाचशे, सहाशे कमावतो. तेवढाच आधार होतो घराला. कालपासूनच हे ओला, उबरचे प्रवासी घेतो आहे. मला त्यातलं फारसं काही कळत नाही, पण प्रयत्न करतो आपला. दिवसभर फोन वाजत असतो. जसं जमेल तसं शिकण्याचा प्रयत्न करतो, तेवढेच चार पैसे जास्त मिळतात. रात्री गेल्यावर शांत झोप तरी लागते..

‘ती’ आवरून जाते ना…?
तीन वर्षांपूर्वी ही गेली आणि मग एकटा पडलो. माणसात असूनही एकटा..मग विचार केला की, आपली मैत्रीण आहे की अजुन..म्हणजे रिक्षा.. म्हणत बाबा खो खो हसायला लागले. बाबा हसत होते, पण त्यांच्या त्या हसण्यामागची वेदना स्पष्ट जाणवत होती. माझ्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तो वीस ते पंचवीस मिनिटांचा प्रवास माझ्यासाठी प्रवास नव्हता आयुष्यातला खूप मोठा अनुभव होता. कसं असतं ना पैसा आहे तर किंमत नाहीतर नाही. बोलत बोलत प्रवास केव्हा संपला हे कळले देखील नाही. आम्हाला सोडल्यानंतर बाबा तर रिक्षा घेऊन दिसेनासे झाले, पण आयुष्याच्या संध्याकाळीही आपल्या कुटुंबासाठी आधारवड बनलेल्या बाबांना वंदन करण्यासाठी माझे हात आपसूकच जोडले गेले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *