जलवाहिनीतील गळती काढली; विजेचाही प्रश्न मार्गी
सिन्नर ः प्रतिनिधी
कडवा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची शिवडे बंधार्यातील काढलेली गळती व पाणीपुरवठा योजनेसाठी महावितरणच्या फीडरवरील दोन गावांना स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची केलेली तरतूद यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाल आहे. त्यामुळे कडवा योजना आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात नगरपालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहर व उपनगरांतील विविध भागांत प्रायोगिक तत्त्वावर नगरपालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत फरलेल्या भागांतही त्रुटी दूर करून संपूर्ण सिन्नर शहर आणि उपनगरांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपालिकेने केल्याने शहरवासीयांची कृत्रिम पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.
सिन्नर शहरासाठी राबविलेल्या कडवा पाणीपुरवठा योजनेतून 24 तास पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना बंद पडलेली स्काडा सिस्टिम, जलवाहिनीला ठिकठिकाणी असलेली गळती आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सिन्नरकरांना कधी तीन ते चार दिवसांनी तर कधी आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत होता.
त्यावर शहरवासीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर गेल्या महिन्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नगरपालिकेत आढवा बैठक घेऊन अधिकार्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर योजनेच्या जलवाहिनीला शिवडे येथील बंधार्यात असलेली गळती काढण्यात आली. त्यातून सुमारे 50 लाख लिटर प्रतिदिन पाण्याची गळती होत होती. गळती काढल्यानंतरही खंडित वीजपुरवठ्याची समस्या कायम होती. त्यावर खासदार राजाभाऊ वाजे यांनी नगरपालिकेची आढावा बैठक घेण्याबरोबरच महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात बैठक घेऊन त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यावर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेल्या फीडरवरील इगतपुरी तालुक्यातील शेणित आणि भरवीर या दोन गावांसाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर टाकण्यात आले. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या बहुतांशी मार्गी लागली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या विविध भागांत नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
प्रतिदिन पावणेदोन कोटी लिटर पाणी
सिन्नर शहराला जुन्या दारणा पाणीपुरवठा योजनेतून 36 लाख लिटर, तर कडवा पाणीपुरवठा योजनेतून एक कोटी 80 लाख लिटर असे एकूण दोन कोटी 16 लाख लिटर पाणी प्रतिदिन मिळणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जलकुंभांची क्षमता कमी असल्यामुळे कडवा योजनेतून दीड कोटी लिटर तर दारणा योजनेतून 25 लाख लिटर प्रतिदिन पाणी उचलले जाते. अमृत योजनेत सुरू असलेल्या जलकुंभांची कामे पूर्ण झाल्यानंतर पूर्णक्षमतेने पाणी उचल्यास सिन्नरकरांना प्रतिदिन पाणीपुरवठा होऊ शकतो.
तीन-चार दिवसांनी मिळणारे पाणी आता दिवसाआड
शहरातील उद्योग भवन, विजयनगर, शिवाजीनगर, मार्केट यार्ड परिसर, कानडी मळा, शंकरनगर, सिन्नर शहराच्या काही भागांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी तीन ते चार दिवसांनी सिन्नरकरांना एक तास पाणी दिले जात होते. आता दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरुच सातपूर येथे भावाने केला भावाचा खून सिडको : दिलीपराज सोनार…
नाशिक: प्रतिनिधी गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिपथात आल्या असून, नगर…
ठेकेदाराकडून अटींचे उल्लंघन, ‘महसूल’चा कानाडोळा नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिक तालुक्यातील जाखोरी गावालगत असणार्या दारणा नदीपात्रात…
पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण सिन्नर : प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020…
राज्य उत्पादन शुल्क, दिंडोरी पोलिसांकडे दारूबंदीची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील वणी खुर्द येथे नऊ…
सिन्नर ः प्रतिनिधी तालुक्यातील पांगरी येथे सिन्नर-शिर्डी महामार्गावर पालखी रोडने जाणार्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने…