एकेकाळी प्रेम म्हणजे विश्वास होता; आज अनेकांच्या मनात त्याच जागी संशय आणि अहंकार दिसतो. प्रेमाच्या नावाखाली जेव्हा स्वार्थ आणि मालकीभाव वाढतो, तेव्हा फक्त एक हृदय तुटत नाही, तर समाजात आणखी एका गुन्ह्याची नोंद होते.
प्रेम ही विश्वास, आदर, त्याग आणि समर्पणावर उभी असलेली पवित्र भावना आहे. मात्र, आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात प्रेमाची व्याख्या बदलताना दिसत आहे. प्रेमाला नकार दिल्याने हल्ला, एकतर्फी प्रेमातून हत्या, सोशल मीडियावरील ओळखीचे गुन्ह्यात रूपांतर अशा घटना वारंवार समोर येत आहेत. ज्या प्रेमामुळे आयुष्य फुलायला हवे, त्याच प्रेमाच्या नावाखाली हिंसा आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
पूर्वी प्रेमाचा पाया समजूतदारपणा, संयम आणि परस्पर आदरावर उभा होता. आज अनेक ठिकाणी प्रेमाचा अर्थ आकर्षण, मालकीभाव आणि अहंकाराशी जोडला जात आहे. सोशल मीडियामुळे नाती पटकन जुळतात; पण भावनिक परिपक्वतेच्या अभावामुळे ती तितक्याच वेगाने तुटतात.
प्रेमाला नकार मिळाल्यानंतर तो स्वीकारण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. त्यातून राग, सूड, पाठलाग, मानसिक छळ, अॅसिड हल्ले आणि खुनासारखे गंभीर गुन्हे घडतात. खरे प्रेम कधीही जबरदस्ती शिकवत नाही. ते दुसर्याच्या स्वातंत्र्याचा, भावनांचा आणि निर्णयाचा आदर करायला शिकवते.
वाढत्या गुन्हेगारीमागे केवळ प्रेमाची बदलती व्याख्या जबाबदार नाही; तर मूल्यशिक्षणाचा अभाव, कुटुंबातील संवाद कमी होणे, सामाजिक माध्यमांचा अतिरेक आणि भावनिक अपरिपक्वताही कारणीभूत आहे. त्यामुळे तरुण पिढीला नात्यांचे महत्त्व, नकार स्वीकारण्याची क्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे संस्कार देणे ही काळाची गरज आहे.
समाजाला प्रेमाची नव्हे, तर प्रेमाच्या योग्य अर्थाची पुनर्स्थापना करण्याची आवश्यकता आहे. प्रेम ही जोडणारी भावना आहे; तोडणारी नाही. ते आयुष्य फुलवण्यासाठी असते, उद्ध्वस्त करण्यासाठी नाही.
प्रेम म्हणजे मालकी नव्हे, तर समजूतदारपणे दिलेले स्वातंत्र्य. एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे त्याच्यावर हक्क गाजवणे नव्हे, तर त्याच्या निर्णयाचाही आदर करणे होय. ज्या दिवशी आपण ‘नाही’ हा शब्द स्वीकारायला शिकू, त्या दिवशी प्रेमाच्या नावाखाली घडणार्या अनेक गुन्ह्यांना आळा बसेल.
शेवटी इतकेच… प्रेम जिंकण्याचे नसते, ते जपण्याचे असते. कारण प्रेमाचा शेवट कधीच हिंसेत होत नाही; तो नेहमी विश्वास, आदर आणि माणुसकीतच होतो. प्रेमाला पवित्रच राहू द्या, त्याला गुन्ह्यांचा चेहरा देऊ नका.
The Changing Definition of Love and Rising Crime
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik