वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे हाल

पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने पशुपालक व कुक्कुटपालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. उष्णतेमुळे पशुधनावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन सहआयुक्त (पशुधन व नियोजन) डॉ. देवेंद्र जाधव यांनी केले आहे.
उष्णलहरींच्या काळात पशुधनाची अशी घ्या काळजी
पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्त्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित
आहार द्यावा.
शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या पशुधनाला सकाळी 11 ते सायंकाळी 4 या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे.
गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा. खिडक्यांना सावलीची व्यवस्था असावी.
उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फर्‍या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.
तातडीच्या उपाययोजना व उपचार : पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेऊन सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे व औषधी साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवावा. फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात याव्यात. जिल्हा प्रशासन, अशासकीय संस्था, तसेच सामाजिक-सेवाभावी संस्थांनी रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी/हौद ठेवावेत. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात.

उष्णलहरींच्या काळात काय करू नये
पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नये.
पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये.
शेतीविषयक व इतर कामांसाठी वापरण्यात येणार्‍या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये.
पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.
पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधू नये.
भरउन्हात पशुधनाची हलचाल / वाहतूक करू नये.
उन्ह असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये.

उष्णलहरींच्या काळात काय करावे?
पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत.
पिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठ्याजवळ व सावलीत असावेत. नसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावे.
चारा, वैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.
खाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावा.
उत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा.
शेती किंवा ओझे वाहणार्‍या पशुधनाला सकाळी 11 ते दुपारी 4 या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी.

पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणार्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. चारा व्यवस्थापन व पशुधनाच्या आरोग्याबाबत कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच 1962 कॉलसेंटरच्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. – डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य

The plight of animals in the face of rising temperatures

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *